सध्या राज्यात सगळीकडे नाताळ आणि नववर्ष स्वागताचा उत्साह आहे. जोडून आलेल्या सुट्ट्या आणि शाळेला असलेल्या सुट्ट्यांमुळे शनिवारपासूनच राज्यातील पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रांमध्ये नागरिकांनी एकच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, सुट्ट्यांच्या या मोसमात नागरिकांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. राज्यातील अनेक विभागांत पावसाने ओढ दिल्याने पावसाळ्यानंतरच पाणीकपातीचे संकट उभे राहिले होते. राज्य सरकारकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, पाणीटंचाईमुळे ३८९ टँकरने ९६१ वाड्यांना, तर ३६६ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. या आकडेवारीत दिवसागणिक भर पडत आहे. राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान आकाराच्या धरणांमध्ये जलसाठा कमी होत आहे.
रविवारी सकाळी जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीने राज्यातील नागरिकांच्या चिंतेत भर टाकली. राज्यातील एकूण २,९९४ लहान-मोठ्या धरणांतील जलसाठ्याची आकडेवारी पाहता नववर्षात पाणीप्रश्न पेटणार हे निश्चित समजले जात आहे. सद्यस्थितीत राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ६३ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. यात छत्रपती संभाजीनगर विभागाची स्थिती सर्वांत बिकट असून मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांमध्ये केवळ ३६.७१ टक्के पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वांत मोठे धरण असलेल्या जायकवाडी धरणात केवळ ४३.३९ टक्के पाणीसाठा आहे. उजनी धरणातही केवळ १८.४३ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे.
नागपूर विभागातील एकूण ३८३ धरणांमध्ये ६८.३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागात असून, यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग भागातील धरणांचा समावेश होतो. राज्यातील पाणीसाठा चिंताजनक असला, तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा तुलनेने समाधानकारक आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा (९७.१३ टक्के) भातसा (७७.५५ टक्के), मोडकसागर (६६.७५ टक्के), मध्य वैतरणा (४६.४८ टक्के) आणि तानसा (७८.२४ टक्के) आदी धरणांमध्ये जवळपास सरासरी ७८ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे मुंबईकरांपुढे सध्यातरी पाणीकपातीची समस्या नसली तरी नजीकच्या काळात हे संकट ओढावण्याची दाट शक्यता आहे.
राज्यातील पाणीसाठा
धरण-सध्याच्या जलसाठा-मागील वर्षी याचवेळची टक्केवारी
उजनी-१८.४३टक्के-१००टक्के
जायकवाडी-४३.३९ टक्के-९१.७७ टक्के
गोसिखुर्द-५०.४४ टक्के-५८.०५ टक्के
तोतलाडोह-७४.४२ टक्के-८२.८२ टक्के
इसापूर-७६.३६ टक्के-९१.३९ टक्के
कोयना-७६.०५ टक्के-८५.८५ टक्के