‘ओबीसी’मधील समावेश वैधच, राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र, जनहित याचिका फेटाळून लावण्याची विनंती

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी प्रकरणात दिलेल्या आदेशाप्रमाणे कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्यापूर्वी किमान सहा तज्ज्ञ समित्यांमार्फत मागासलेपण तपासूनच विविध जातींचा समावेश इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) या आरक्षण प्रवर्गात करण्यात आला. कित्येक समुदाय व जातींचा समावेश हा त्यांचे मागासलेपण न तपासताच केवळ जीआरच्या आधारे बेकायदा करण्यात आला, या म्हणण्यात काहीच तथ्य नाही’, असा दावा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. त्याचबरोबर ‘ओबीसी’मधील जातींच्या समावेशाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका फेटाळून लावण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

‘ओबीसी प्रवर्गात खऱ्या अर्थाने मागासलेल्या समुदायांऐवजी भलतेच समुदाय लाभ घेत आहेत. त्यांचा समावेश खऱ्या अर्थाने मागासलेपण न तपासताच केवळ जीआरच्या आधारे करण्यात आला. शिवाय लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षणही मनमानी पद्धतीने १४वरून ३० टक्क्यांपर्यंत करण्यात आले,’ असा दावा करणाऱ्या जनहित याचिका अनेकांनी अॅड. पूजा थोरात, अॅड. रोहन महाडिक, अॅड. भावना दुबे पाटील आदींमार्फत केल्या आहेत. त्याच्या उत्तरादाखल महाधिवक्ता डॉ. वीरेंद्र सराफ व सरकारी वकील भूपेश सामंत यांनी सरकारचे सविस्तर प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले. या प्रतिज्ञापत्रातील मुद्द्यांबाबत प्रत्युत्तर दाखल करण्याची संधी याचिकाकर्त्यांना देऊन न्यायालयाने पुढील सुनावणी सात फेब्रुवारीला ठेवली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सवरुन आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा, म्हणाले घटनाबाह्य सरकार…..

‘याचिका विशिष्ट हेतूनेच’

‘सरकारने ओबीसीमध्ये मागास जातींचा समावेश हा रीतसर सर्वेक्षण करून व अहवाल मागवूनच केलेला आहे. कित्येक वर्षे ते अबाधित आहे. वेळोवेळी अनेक जातींचा समोवश या प्रवर्गात केलेला असताना त्या-त्या वेळी याचिकाकर्त्यांनी त्याला आव्हान दिले नाही आणि आता अनेक दशकांनी त्याला आव्हान दिले आहे. त्यावरून विशिष्ट हेतूने या याचिका करण्यात आल्याचे स्पष्ट होते. शिवाय प्रवर्गातील जातींच्या समावेशाचा आढावा राज्य मागासवर्ग आयोगाकडून वेळोवेळी घेतला जात असतो,’ असे म्हणणे सरकारने प्रतिज्ञापत्रात मांडले आहे.

सरकारने मांडला आरक्षणाचा इतिहास

‘स्वातंत्र्यपूर्व काळात सन १९०२मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी वंचित घटकांना प्रशासनातील रिक्त पदांसाठी आरक्षण दिले होते. त्यानंतर ब्रिटिश राजवटीतही मागास घटकांची यादी तयार करण्यात आली होती. १९४२मध्ये बॉम्बे गव्हर्नमेंटने मागास समुदायांची निश्चिती केली होती. मग स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली असताना १ नोव्हेंबर १९५० रोजी मागास प्रवर्गांसाठी सुधारित आरक्षण टक्केवारी ठरवण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने २९ फेब्रुवारी १९५३ रोजी काका कालेलकर यांचा पहिला आयोग स्थापन केला. या आयोगाने योग्य त्या निकषांच्या आधारे अहवाल दिला. १९५६मध्ये बॉम्बे प्रांत असताना ओबीसीची एकीकृत यादी तयार करण्याचे निश्चित झाले. त्यानंतर थडे समितीच्या सविस्तर अहवालाच्या आधारे तसेच देशमुख समितीच्या अहवालाच्या आधारे राज्य सरकारने ९ एप्रिल १९६५ रोजीच्या जीआरद्वारे एससी, एसटी, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि ओबीसी आरक्षणाची टक्केवारी निश्चित केली. त्यानंतर सर्वेक्षणाबरोबरच विविध अहवालांच्या आधारे १९६७मध्ये ओबीसीमधील जातींची यादी एकीकृत करण्यात आली. त्यानंतर वेळोवेळी विविध समाज व समुदायांकडून आलेल्या निवेदनांचा विचार करून त्यासंदर्भात अहवाल मागवल्यानंतरच ओबीसीमध्ये आणखी जातींचा समावेश करण्यात आला’, अशा स्वरूपात सरकारने प्रतिज्ञापत्रात ओबीसी आरक्षणाचा सविस्तर इतिहास मांडला आहे.

महाराष्ट्रात राम राज्य आहे का? शिंदेंनी राजधर्माचं पालन करावं; पडळकरांची सरकारवर टीका

Source link

Bombay high courtmaharashtra governmentmumbai newsobc quotaOBC reservationओबीसी आरक्षणओबीसी कोटामहाराष्ट्र सरकारमुंबई न्यूज
Comments (0)
Add Comment