या संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघदृष्ट्या मुंबई महानगर प्रदेशात ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, पालघर व रायगड या सहा जिल्ह्यांचा समावेश होतो. तर प्रशासकीयदृष्ट्या बृहन्मुंबई महापालिका क्षेत्र हे मुंबई महानगर म्हणून गणले जाते. संघदृष्ट्या या सहा जिल्ह्यांत जवळपास ७२ नगरांचा समावेश होतो. त्या नगरांमध्ये १८ हजार वस्त्या आहेत. या प्रत्येक वस्तीचा एक प्रमुख नेमण्यात येऊन त्या वस्ती प्रमुखामार्फत हे संपर्क अभियान राबवण्यात आले. त्याचवेळी मुंबई महानगरातील रचना वेगळी होती. मुंबई महानगरात संघाचे जवळपास १० भाग आहेत. या दहा भागांखाली नगरव्यवस्था व त्याखाली वस्ती, यामार्फत हे अभियान राबविण्यात आले. मुंबई महानगरात जवळपास ६ हजार वस्त्या आहेत.
प्रतिवस्ती पाच किलो तांदूळ
याअंतर्गत वितरित करण्यात आलेल्या अक्षतांमध्ये ‘वाडा कोलम’ तांदळाचा समावेश होता. हा वाडा कोलम तांदूळ कोकणातून अयोध्येत रवाना करण्यात आला होता. मुंबई महानगर प्रदेशातील एकूण २४ हजार वस्त्यांसाठी प्रतिवस्ती पाच किलो अक्षतांचे वितरण करण्यात आले. या अक्षता ३० डिसेंबरलाच त्या-त्या वस्तीत पोहोचत्या करण्यात आल्या. त्यानंतर १ ते १५ जानेवारीदरम्यान घरोघरी हे संपर्क अभियान सुरू होते.
दररोजचे माहिती संकलन
अभियानांतर्गत प्रत्येक घरी संपर्क व्हावा व प्रत्येक घरी अक्षता पोहोचत्या व्हाव्यात यासाठी यासाठी वस्ती प्रमुखांच्या समन्वयासाठी अभियान प्रमुखदेखील प्रत्येक वस्ती व प्रत्येक नगरात नियुक्त करण्यात आले होते. हे प्रमुख दररोज किती घरी संपर्क झाला, त्यात किती रामसेवक, सेविका, बालसेवक, बालसेविकांचा समावेश होता, याची आकडेवारी घेत होते. त्यानुसार लक्ष्यपूर्तीसाठी प्रयत्न करण्यात आले.