मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे?; शिवसेनेचा सवाल

हायलाइट्स:

  • परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन राजकारण तापणार
  • शिवसेनेचा भाजपला टोला
  • चंद्रकांत पाटलांच्या त्या विधानावरुन टीका

मुंबईः ‘साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणानंतर भाजपने परप्रांतीयांचा मुद्दा उकरुन काढला. मुंबईत बाहेरून आलेल्यांवर लक्ष ठेवा, असे मुख्यमंत्री (Cm Uddhav Thackeray) पोलिसांना सांगतात व त्याचे राजकीय भांडवल भाजपसारखे (BJP) पक्ष करतात. हे राजकारण उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी व मुंबई महानगरपालिकेसाठी चालले आहे. एक दिवस भाजपचे लोक मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील,’ अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला सुनावलं आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवण्याची आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशावर भाजपनं सडकून टीका केली होती. त्यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.

‘महाराष्ट्रात जगभरातून जे लोंढे वाहत येतात त्याची नोंद कुठेच नाही. ते कोठेही राहतात, काहीही करतात. हे सर्व प्ररप्रांतीय लोक कुठून येतात, काय करतात, त्यांचा आगापिछा काय याची नोंद ठेवणे गरजेचे आहे. पोलिसांनी ते काम करावे अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली, त्यावर भाजपनं मुंबईत आंदोलन केलं. मुंबईसारख्या शहरातील वातावरण शुद्ध राहावे, सुरक्षित राहावे यासाठी हे आवश्यक ठरते राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेशी निगडीत अशी ही भूमिका आहे, पण भाजपनं यावर आंदोलनं सुरू केले,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

परप्रांतीय कोण?

‘मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीय म्हणून कोणत्याही राज्याचे व भाषिकांचे नाव घेतले नाही. पण भाजपने हे परप्रांतीय उत्तर भारतीय असे परस्पर जाहीर केले. हे समाजात फूट पाडण्याचे राजकारण आहे. असे करणाऱ्यांबद्दल गुन्हेच दाखल केले पाहिजेत. मुंबईसारख्या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्व जाती-धर्मांचे, प्रांताचे लोक राहतात. बंगाल, ओडिशा, आसाम, तामीळ, तेलगू लोकांच्या येथे मोठ्या वसाहती आहेत. माटुंगा- धारावीवर दाक्षिणात्यांचा मोठा पडगा आहे व ते परप्रांतीय म्हणून राजकीय नृत्य करताना दिसत नाहीत. मुंबईत तर बऱ्याच अंशी गुजराती बांधवांनी व्यापली आहे. गुजराती, जैन, मारवाडी हे पिढ्यापिढ्या मुंबई महाराष्ट्राच्या जीवनप्रवाहाचे घटक बनले. मग मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे?,’ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

‘मुंबईत दंगली घडवणारे, बॉम्बस्फोट घडवणारे, दहशतवादी कारवायांना हातभार लावणारे, महिलांची छेडछाड करणारे, गुन्हेगारी वाढवणारे व तेथील भूमिपुत्रांचे जगणे हराम करणारे अशा लोकांचा कळवळा घेऊन भाजप परप्रांतीय प्रेमाचे कढ काढीत असेल तर ते बरोबर नाही,’ अशी टीका राऊतांनी केली आहे.

रोखठोक सदरातील महत्त्वाचे मुद्दे

  • ममता यांनी मोदी- शहांना बाहेरचे ठरवले होते. बाहेरचे लोक म्हणजे कोण? त्या बाहेरच्या लोकांच्या पराभव बंगाली जनतेनं केला. याचे धडे महाराष्ट्रात परप्रांतीयाचे राजकारण करणाऱ्यांनी बंगालतून शिकायला हवेत. महाराष्ट्रात हे असे कधीच घडले नाही.

  • गुजरात, आसाम, तामीळनाडू, कर्नाटकात परप्रांतीयांविरुद्ध आंदोलने अनेकदा झालीच आहेत. बेळगावातील मराठी लोकांना आजही परप्रांतीयच समजले जाते व बेळगावातील निवडणुकीत मराठी एकीकरण समितीचा पराभव झाला म्हणून महाराष्ट्रात पेढे वाटणारेच मुंबईत परप्रांतीय वादास फोडणी देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले हे समजून न घेता त्यांचे उधळणे सुरू आहे. उत्तर प्रदेश विधासभेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून परप्रांतीयांचा मुद्दा उकरुन काढणे हा दळभद्री प्रकार आहे.

  • माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक साळसूद प्रश्न विचारला आहे. परप्रांतीयांना का दोष देता?, मराठी लोक गुन्हे करत नाहीत का? मराठीद्वेष भाजपातील मराठी नेत्यांच्या रोमारोमांत कसा भिनला आहे ते या एका वाक्यात दिसते. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या मंत्र्यांवर ईडीचा ससेमिरा लावता, मग भाजपचे सर्व पुढारी धुतल्या तांदळासारखे आहेत काय? ईडी त्यांच्यामागे का लागत नाही? आर्थिक गुन्हे फक्त शिवसेना, राष्ट्रवादीचेच लोक करतात काय? हे चंद्राकांत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाचे रोख उत्तर आहे.

Source link

maharashtra migrant populationmumbai cape casesakinaka rape caseSanjay Rautshivsena vs bjpसंजय राऊत
Comments (0)
Add Comment