‘…तर लडाखच्या हद्दीत चिनी सैनिकांची घुसखोरी झालीच नसती’

मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीची धडक बसून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानं वातावरण तापलं आहे. योगी सरकारनं जिल्ह्याच्या सीमा सील केल्या आहेत. पीडित शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळं तणावात भर पडली आहे. शिवसेनेनं ही संधी साधत केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. (Shiv Sena targets Modi Government over Lakhimpur Kheri Violence)

लखीमपूर खेरीतील घटनेनतर उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं तिथं कोणालाही जाण्यास मनाई केली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांची धरपकड सुरू आहे. शेतकऱ्यांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली. खासदार दीपेंदर हुड्डा यांना धक्काबुक्की करण्यात आली. अखिलेश यादव यांना कोंडून ठेवण्यात आलं. ‘हे काय चाललं आहे?’, असा सवाल शिवसेनेनं ‘सामना’तून केला आहे.

वाचा: ‘यूपीत इतकं मोठं मृत्युकांड होऊनही देशातला मीडिया आर्यन खानच्या बातम्या देतोय’

”लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांच्या हत्यांनी देश हादरला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशच्या रामभूमीवर चिरडण्यात आले. ज्या भूमीवर शेतकरी दोन वर्षांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत, त्यांचा आक्रोश ऐकायला सरकार तयार नाही. गाझीपूरच्या सीमेवर लोखंडी पिंजरे चारही बाजूंनी उभे करून शेतकऱ्यांना बंदिवान बनवून ठेवले. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. अश्रुधूर, लाठ्या चालविल्या गेल्या. इतकं सगळं करण्यापेक्षा सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य का करीत नाही? त्यांचं म्हणणं का ऐकत नाही? शेतकरी ठार मेला तरी चालेल, पण सरकार एक इंचही मागे हटणार नाही, हा ताठा व बाणा स्वकियांविरुद्ध जितका आहे, तितका परकीय आक्रमकांविरुद्ध दिसत नाही! लखीमपूर खेरीच्या सीमा ज्या पद्धतीनं सीलबंद केल्या, तेवढा ताठा चीन सीमेवर दाखवला असता तर लडाखच्या हद्दीत चिनी सैनिकांची घुसखोरी झालीच नसती. तिथं चिनी सैन्य रोज पुढं येतंय आणि देशात शेतकऱ्यांची आणि राजकीय विरोधकांची नाकाबंदी चालली आहे,’ अशी जळजळीत टीका शिवसेनेनं केली आहे.

वाचा: बड्या दलालांना अटक होऊनही मुंबईत कुठून व कसे येतेय ड्रग्ज?

महाराष्ट्रातील भाजप नेते मराठवाडा, विदर्भातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर पोहोचले. तेव्हा त्यांना कोणी रोखलं नाही, पण उत्तर प्रदेशात शेतकरी चिरडून मारले गेले. शेतकऱ्यांना मारायचं व राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करायची ही कसली लोकशाही?,’ असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

Source link

Lakhimpur Kheri ViolenceSaamana editorialshiv senashiv sena targets modi governmentलखीमपूर खेरी हिंसाचारशिवसेनासामना
Comments (0)
Add Comment