‘इंडिया’ आघाडीला मुस्लिम समाजाच्या मतांचा फायदा
लोकनीती प्रोग्राम फॉर कंपेरेटिव्ह डेमोक्रसी (CSDS)ने सर्वे केला आहे. त्या सर्वेनुसार, अल्पसंख्याकांची चांगली लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ७५ टक्के मुस्लिमांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मतदान केले. तर उत्तर प्रदेशातील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ७९ टक्के मुस्लिमांनी तर बिहार विधानसभा निवडणुकीत ७७ टक्के मुस्लिमांनी इंडिया आघाडीला मतदान केले.
इंडिया आघाडीकडून ७८ मुस्लिम उमेदवार रिंगणात
यावेळी इंडिया आघाडीच्या वतीने एकूण ७८ मुस्लिम उमेदवार रिंगणात आहेत, तर गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या ११५ इतकी होती. त्यापैकी २६ जागा निवडून आल्या होत्या.
बसपाने मुस्लिम उमेदवारांना सर्वाधिक तिकिटे दिली
मुस्लिम समाजातील तिकीट वाटपावर जर आपण नजर टाकली तर बहुजन समाज पार्टीने सर्वाधिक ३५ उमेदवार उभे केले आहेत. यानंतर काँग्रेस १९ उमेदवारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तृणमूल कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाने उत्तर प्रदेशमध्ये ९९ मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले होते. त्यामुळे मुस्लिम मतांची विभागणी झाली होती.
तर भाजपसाठी अडचण निर्माण होणार
प. बंगालमधील राजकीय विश्लेषक जयंत घोषाल यांनी मुस्लिम समाजाच्या मतांबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सध्या ३०% मुस्लिम व्होट बँक काँग्रेस, सीपीएम आणि मुस्लिम सेक्युलर फ्रंट या पक्षांमध्ये विखुरलेली आहे. टीएमसीच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने सीएएच्या मुद्द्यावर भाजपविरोधात प्रचार करत आहेत, त्यानुसार जर हा समुदाय तृणमूलच्या बाजूने गेला तर भाजपला अडचणी येऊ शकतात.