लोकसभा निवडणूक २०२४च्या निकालात भाजपला अशी एक गुड न्यूज मिळाली आहे ज्याची प्रतिक्षा ते अनेक वर्ष करत होते. भाजपने गेल्या अनेक निवडणुकांपासून दक्षिणेतील राज्यावर फोकस केला होता. पण त्यांना कधीच यश मिळाले नाही. यात तामिळनाडू आणि केरळ या राज्याने भाजपला कधीच स्विकारले नाही. केरळ सारखे राज्य तर डाव्यांचा गड मानला जातो. या ठिकाणी भाजपचे कमळ फुलले आहे. केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार आणि राज्यसभेचे खासदार सुरेश गोपी यांनी विजय मिळवला. भाजपच्या स्थापनेपासून केरळमध्ये विजय मिळवण्याचे त्यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. मात्र पक्षाला देशात मोठा झटका पहायला मिळाला.
सुरेश गोपी यांना एकूण ४ लाख १२ हजार ३३८ मते मिळाली. २०१९ साली त्यांचा याच मतदारसंघातून पराभव झाला होता. सिने अभिनेते असलेले गोपी यांनी यावेळी माकपच्या व्ही एस सुनिलकुमार यांचा यांचा पराभव केला. काँग्रेसचे के मुरलीधरन हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. सुरेश गोपी यांनी 74 हजार 686 मतांनी विजय मिळवला. त्रिशूरमधील हा विजय भाजपसाठी मोठा आश्वासक म्हणावा लागले.
केरळमध्ये लोकसभेच्या २० जागा असून त्यापैकी १४ जागा काँग्रेसने, २ जागा आययूएमएल, माकप, भाजप, केईसी आणि आरएसपी या पक्षांनी प्रत्येकी १ जागा जिंकल्या आहेत. राज्यात काँग्रेसला ३५.०६ टक्के, भाजपला १६.६८ टक्के मते मिळाली.
एकूण देशाचा विचार करता भाजपला २४०, काँग्रेसला ९९, सपाला ३७, तृणमूल काँग्रेसला २९, डीएमकेला २२, टीडीपीला १६ तर जनता दल युनायडेटला १२ जागा मिळाल्या आहेत.