देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेत्यांबरोबर तरूण नेत्यांनाही संधी दिली गेली आहे. महाराष्ट्रातून आमचे नेते नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव, त्याचबरोबर मुरली अण्णा मोहोळ, रक्षा खडसे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळेल. या सर्व नेत्यांचे मी शपथविधीच्या पूर्वीच अभिनंदन करतो मानतो.
राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्यावतीने राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी एक जागा ऑफर करण्यात आली होती. मात्र आमच्याकडून प्रफुल पटेल यांचे नाव अंतिम झाले असल्याने आम्हाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असे राष्ट्रवादीने आम्हाला कळविले. ज्यावेळी युतीचे सरकार असते त्यावेळी काही निकष तयार करण्यात येतात. अनेक पक्ष सोबत असल्याने त्यांनाही न्याय द्यायचा असतो. एका पक्षासाठी निकष मोडता येत नाहीत. पण भविष्यात जेव्हाही मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यावेळी आम्ही त्यांच्या मागणीचा विचार करू.
सध्या आमच्या मागणीच्या पूर्तता होत नसेल तर हरकत नाही परंतु आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच मिळावे, अशी त्यांची मागणी होती. प्रफुल पटेल यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा कारभार सांभाळल्याने त्यांना राज्यमंत्रिपद देऊ शकत नाही, असे राष्ट्रवादीने कळविले. भविष्यात मंत्रिमंडळ विस्तारावेळी मागणीची पूर्तता करू, असे आम्हीही कळविल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा भौगोलिक विचार करता मंत्रिमंडळात मराठवाड्याला स्थान देण्यात आलेले नाही, असे विचारले असता, आत्ता मर्यादित लोक शपथ घेत आहेत. अजून बऱ्याच जागा शिल्लक आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावेळी नक्की विचार होईल.