Maharashtra Bandh: नवरात्रीत महाराष्ट्र बंद ही तिघाडीची महिषासुरी चाल; भाजपचा हल्ला

हायलाइट्स:

  • लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’
  • महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष रस्त्यावर
  • भाजपचा बंदवर कडाडून हल्लाबोल

मुंबई: लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसनं आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदवर (Maharashtra Bandh) भारतीय जनता पक्षानं कडाडून टीका केली आहे. ‘नवरात्री उत्सवाच्या काळात महाराष्ट्र बंद करणे ही तिघाडीतील तीन पक्षांची महिषासुरी चाल आहे,’ अशी टीका भाजपनं केली आहे.

वाचा: Live मुंबईत ९ बेस्ट बसवर दगडफेक; पोलीस संरक्षण देण्याची मागणी

भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ट्वीट करून महाआघाडीच्या बंदच्या भूमिकेवर आसूड ओढले आहेत. ‘ज्यांनी मुंबईला बंद करून आपलं दुकान चालवलं त्या तथाकथित ‘बंदसम्राटांचा’ इतिहास आज पुन्हा आठवा. मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठिंबा देऊन कामगारांना उद्ध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करून कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले. एवढंच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचं काम बंद करून मुंबईकरांना वेठीस धरलंय. कोस्टल रोडला विरोध… नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध. मेट्रोचेही हे विरोधकच. हे तर विकासातील गतीरोधक आहेत,’ अशी टीका शेलार यांनी तिन्ही पक्षांवर केली आहे.
वाचा: राजकीय किंमत चुकवावी लागली तरी…; वरुण गांधींचं अभिनंदन करत शिवसेनेची भाजपवर टीका

‘बंद आणि विरोध हाच यांचा ‘धंदा’ आहे. त्यावरच यांचा ‘चंदा’ गोळा होतो. हे ‘बंद’ आता बंदच केले पाहिजेत. आई जगदंबेच्या नवरात्री उत्सवाच्या काळात महाराष्ट्र बंद करणं ही तर तिघाडीतील तीन पक्षांची ‘महिषासुरी’ चाल आहे,’ असा आरोप करतानाच, ‘आई दुर्गामाते, या महिषासुरांचा बंदचा हा खेळ उधळून टाकण्यासाठी जनतेला बळ दे,’ असं साकडं शेलार यांनी घातलं आहे.

Source link

Ashish Shelar attacks Maha Vikas AghadiAshish Shelar News TodayBJP Attacks Maha Vikas Aghadimaha vikas aghadimaharashtra bandhआशिष शेलारमहाराष्ट्र बंदमहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment