तांदळाच्या हमीभावात वाढ
केंद्रीय मंत्रिमंडळाने तांदळासह १४ खरीप पिकांच्या हमीभावात वर्ष २०२४-२५च्या हंगामासाठी वाढ करण्याचा निर्णयही घेतला. तांदळाच्या हमीभावात ५.३५ टक्के वाढ करून प्रतिक्विंटल २३०० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. सरकारकडे तांदळाचा पाच कोटी ३४ लाख टन अतिरिक्त साठा असूनही महाराष्ट्र, हरयाणा, झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या शिफारशींनुसार १४ खरीप पिकांचा हमीभावही जाहीर करण्यात आला. तांदळाच्या सामान्य श्रेणीचा हमीभाव ११७ रुपयांनी वाढवून प्रतिक्विंटल २३०० रुपये, तर अ दर्जाच्या तांदळाचा भाव २३२० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. हमीभाव हा उत्पादन किंमतीच्या दीड पट अधिक असावा, या २०१८मधील धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाराणसी विमानतळाच्या विकासासाठी २८६९ कोटी
वाराणसीतील लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार करण्यात येणार असून, त्यासाठी २८६९ कोटी रुपये मंजूर करण्य़ात आले आहेत. नवी टर्मिनल इमारत, विमान पार्किंग भागाचे आणि धावपट्टीचे विस्तारीकरण तसेच समांतर टॅक्सी मार्गाचा या कामांमध्ये समावेश आहे. यानंतर सध्याच्या वार्षिक ३९ लाख प्रवाशांवरून ९९ लाख प्रवाशांपर्यंत क्षमतावाढ होणार आहे.