तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Ladki Bahin Yojana: एक कोटी महिलांची योजना ‘लाडकी’; योजनेसाठी राज्यभरात अर्जांचा पाऊस, सर्वाधिक अर्ज पुण्यातून

0 38

मुंबई : मुंबईसह राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री- लाडकी बहीण योजने’ला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत ७० टक्क्यांहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी झाल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील सूत्रांनी दिली. या योजनेसाठी शनिवारपर्यंत एक कोटी २१ लाख २१ हजार १६६ अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्या आले. या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून, १९ ऑगस्ट रोजी या योजनेतील पहिला हप्ता देण्याचा मानस असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी देण्यात दिली.आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजना’ जाहीर केली. या योजनेत राज्यातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचे निकषही राज्य सरकारने जाहीर केले आहेत. सध्या या योजनेसाठी महिलांना अर्ज करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, राज्यभरात १ कोटी २१ लाख २१ हजार १६६ महिलांनी अर्ज केल्याची माहिती हाती आली आहे.

सध्या राज्यातील ग्रामपंचायत आणि विधानसभानिहाय अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामपंचायत पातळीवर चावडी वाचन करीत या योजनेतील पात्र महिलांच्या यादीची माहिती देण्यात येत आहे. विधानसभानिहाय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीही जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार देखरेख ठेवण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि इतर पातळीवर प्राप्त माहितीनुसार, जवळपास सर्वच जिल्ह्यांत ७० ते ७५ टक्के महिलांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
Mazi Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’वर दादांच्या अर्थ मंत्रालयाचा आक्षेप; ८ लाख कोटींचं कर्ज असताना योजना कशासाठी?
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असल्याने काही ठिकाणी नोंदणी प्रक्रियेचा वेग कमी असला तरी १९ ऑगस्ट रोजी या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांचा खात्यावर जमा करण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाचे प्रयत्न सुरू आहेत.

सर्वाधिक अर्ज पुण्यातून

या योजनेत आत्तापर्यंत सुमारे सव्वाकोटी महिलांनी अर्ज केले असून, यात सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत. पुण्यात शुक्रवारीपर्यंत पाच लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांत प्रत्येकी चार लाखांच्या घरात अर्ज नोंदणी झाल्याची माहिती महिला व बालविकास मंत्रालयातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या योजनेसाठी महिलांची नोंदणी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. योजनेबाबत वेळोवेळी आढावा बैठका सुरू आहेत. आत्तापर्यंत १ कोटी २१ लाख २१ हजार १६६ महिलांनी अर्ज केले आहेत. त्यांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. योजनेचा पहिला हप्ता १९ ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांना देण्याचा आमचा मानस आहे.– आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.