
Tej Police Times
बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेत कापसाच्या सुताच्या उद्योगाचा मोठा वाटा आहे. सूत तयार करण्यासाठी बांगलादेश कापसाचे उत्पादन होणाऱ्या देशांकडून मोठ्या प्रमाणात कापसाच्या गाठीची आयात करतो. यात भारत, ब्राझील व अमेरिका या तीन देशांमधून कापसाची सर्वाधिक निर्यात केली जाते. मात्र, बांगलादेशमध्ये उसळलेल्या असंतोषामुळे तेथे राजकीय अस्थिरती निर्माण होऊन कापसाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. कापसाच्या गाठीचे अनेक कंटेनरदेखील सीमेवरच अडकून पडले आहेत. बांगलादेशात ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास सुमारे तीन लाख गाठींचा माल भारतीय बाजारपेठेतच शिल्लक राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
भारतातून २२ लाख गाठींची निर्यात
भारताकडून दरवर्षी ३५ ते ४० लाख कापसाच्या गाठींची निर्यात वेगवेगळ्या देशात केली जाते. त्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक गाठींची निर्यात बांगलादेशात होते. दरवर्षी भारताकडून जवळपास २० ते २२ लाख गाठींची निर्यात केली जाते. त्यापैकी यंदा जुलैच्या अखेरपर्यंत १७ लाख गाठींची निर्यात झाली होती. मात्र, सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारताकडून जाणाऱ्या तीन लाख गाठींची निर्यात अडचणीत आली आहे. भारतासोबतच ब्राझील व अमेरिकेतून बांगलादेशात होणारी निर्यातदेखील थांबली आहे.
Bangladesh Onion Export: बांगलादेशातील कांदा निर्यात सुरळीत; अडकून पडलेले नाशिकचे ७० ट्रक रवाना
…तर आगामी हंगामावर परिणाम
कापसाच्या नवीन हंगाम खरेदीला ऑक्टोबरपासून सुरुवात होते. आता निर्यात होऊ शकली नाही, तर तीन लाख गाठींचा स्टॉक भारतीय बाजारपेठेत शिल्लक राहील. यामुळे आगामी हंगामावर परिणाम होऊ शकतो. यासह बांगालादेशात अस्थितेच्या परिस्थितीपूर्वी भारतातून ज्या मालाची निर्यात करण्यात आली होती. त्याचा मोबदलाही अद्याप मिळाला नसल्याने व्यापारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
बांगलादेशातील अस्थिरतेमुळे तीन लाख गाठींची निर्यात अडचणीत आली आहे. परिस्थिती कायम राहिल्यास सप्टेंबरअखेरपर्यंत यात आणखी दोन लाख गाठींची निर्यात अडचणीत येईल. सीसीआयकडून यंदा शेतकऱ्यांना ७,५०० रुपयांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मिळणाऱ्या भावावर याचा फारसा परिणाम होणार नाही.– प्रदीप जैन, अध्यक्ष, खान्देश जिनिंग असोसिएशन
Recover your password.
A password will be e-mailed to you.