
Tej Police Times
आपल्याकडे “लक्ष्मी” या शब्दामागे अनेक प्रकारच्या संकल्पना आहेत.शास्त्रातदेखील धनलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, गृहलक्ष्मी, शुभलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, आयुर्लक्ष्मी इत्यादि लक्ष्मीचे निरनिराळे अवतार विशद केलेले असून व्यवहारातदेखील अशाच प्रकारचे विविध आविष्कार दिसून येतात. त्यातील काही ठळक आविष्कार म्हणजे भरपूर पैसे मिळतात पण खर्च कसा होतो कळत नाही.
कष्ट अफाट पण पैसे कमी, कष्ट कमी पण पैसे पुष्कळ, पैसे पुष्कळ पण त्यामानाने सुख नाही, सुखे पुष्कळ पण चित्तास समाधान नाही, पैशाची आवक जितकी जास्त तितकी व्यसने व संकटे जास्त, असे अनेक प्रकारचे लक्ष्मीचे खेळ सतत चालू असतात. त्यामुळे शास्त्रानेही या सर्व प्रकारांना अनुलक्षून लक्ष्मीची विविध व्रते सांगितली आहेत. त्यापैकी एक व्रत म्हणजे वरदलक्ष्मी व्रत होय.
तुम्ही पाहिले असेल आपण भरपूर कष्ट करून भरपूर पैसे मिळवतो पण महिन्याच्या अखेरीस काही शिल्लक राहत नाही. जे काही कमावलेले पैसे असतात ते कसे आणि कधी खर्च होतात ते कळत नाही, अशावेळी लक्ष्मीचा वरदहस्त असणे आवश्यक आहे. ही वरदलक्ष्मी आपल्याकडे कायम राहावी असे प्रत्येकाला वाटते. यासाठीच शास्त्रात वरदलक्ष्मी व्रत सांगितले आहे.
मनोभावे हे व्रत केले तर तर लक्ष्मीचे वरदान तुम्हाला नक्की मिळेल. वरदलक्ष्मीचे व्रत लक्ष्मीच्या इतर काही व्रताप्रमाणे सायंकाळी (प्रदोष समयी) करतात. ही पूजा केवळ स्त्रियांनीच करावी अशी काही लोकांची समजूत आहे. पण शास्त्रात तसा काहीही उल्लेख नाही. त्यामुळे पुरुषांनाही ही पूजा करता येते. उभयता पतिपत्नी मिळूनही ही पूजा करता येते. या व्रताची माहिती भविष्योत्तर पुराणात तुम्हाला मिळेल.
वरदलक्ष्मी व्रताच्या पूजेत प्रथम ‘मदगृहे अखण्डलक्ष्मीसाहचर्यसिद्धिद्वारा ऋणपरिहारपूर्वकं आयवृद्धयर्थं निरहङ्कङ्गतिपूर्वक धनधान्यादि-ऐश्वर्य- प्राप्त्यर्थं आस्मिन् श्रावणमासि भृगुवासरे कल्पोक्ततिथौ कल्पोक्तविधिना श्रीवरदलक्ष्मीव्रतमहं करिष्ये ।।’ असा संकल्प करून “क्षीरसागरसम्भूतां क्षीरवर्णसमप्रभाम् । क्षीरवर्णसमं वस्त्रं दधानां हरीवल्लभाम् ।।” या मंत्राने ध्यान करून इतर मंत्राबरोबरच “श्रीवरदलक्ष्म्यै नमः” या नाममंत्राने लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करून तिच्यासमोर ठेवलेला
दोरा (हळदीने रंगविलेले सूत्र, दोरा) “सर्वमङ्गलमाङ्गल्ये सर्वपापप्रणाशनि । दोरकं प्रतिगृह्णामि सुप्रीता हरिवल्लभे ॥” या मंत्राने ग्रहण करावा. तो “करिष्यामि व्रतं देवि त्वद्भक्तस्त्वत्परायणाः । श्रियं देहि यशोदेहि सौभाग्यं देहि मे शुभे ।।” या मंत्राने पत्नीकडून किंवा पुरोहिताकडून तो उजव्या हातास बांधून घ्यावा. नंतर तूप साखरेत तयार केलेल्या करंज्यांचे वाण द्यावे. वाण देताना “इन्दिरा प्रतिगृह्णाति इन्दिरावै ददाति च । इन्दिरा तारकोभाभ्याइन्दिरायै नमो नमः ।।” हा मंत्र म्हणावा. हे वाण ब्राह्मण, देवी, यति, ब्रह्मचारी व सुवासिनी अशा पाच जणांना द्यावे.
हे व्रत बरेच प्रभावी असल्याचे दाखले आहेत. पूजेच्या विधीत स्थानपरत्वे थोडे बदल दिसून येतात. काही ठिकाणी वरुणपूजा करतात तर काही ठिकाणी फक्त तांदुळ पुंजावरच मुख्यदेवता मांडून पूजा करतात. वरदलक्ष्मीच्या कथेत हे व्रत श्रावणपौर्णिमा जेव्हा शुक्रवारी येते तेव्हा हे व्रत करावे असा उल्लेख आहे. तर काहीजणांच्या मते हे व्रत श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी करावे असे आहे. पण श्रावणाच्या दुसऱ्या शुक्रवारी हे व्रत करण्याची प्रथा महाराष्ट्रात व अन्य काही राज्यांतही प्रचलित आहे. हे काम्य व्रत असल्यामुळे ठराविक काळानंतर त्याचे उद्यापन करता येते.
साधारणतः हे व्रत एका पिढीत किमान एकदा करता यावे म्हणून या व्रताचा कालावधी एकवीस वर्षांचा दिलेला आहे. एकवीस वर्षानंतर उद्यापन झाल्यावर हे व्रत पुढच्या पिढीस इच्छा असेल तर जरूर द्यावे. काही घराण्यात हे व्रत पिढ्यान पिढ्या चालू असते. पण एकवीस वर्षानंतर उद्यापन करून पुढील पिढीची या व्रतासाठी नियुक्ती करणे अत्यावश्यक आहे. पूर्वी संस्थानिकांच्या काळात काही राजघराण्यात हे व्रत नित्यव्रत म्हणून गणले जात असे.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.