
Tej Police Times
शनिवार हा बजरंगबली हनुमान यांना समर्पीत आहे. त्यांना मारुती असे ही म्हणतात. त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर रहावी म्हणून मारुतीची कहाणी वाचली जाते. काय आहे त्या कहाणीमध्ये, आपण ही वाचूया शनिवारची मारुतीची कहाणी.
एका आटपाट नगरात एक ब्राह्मण, मुलगा व सून राहत होते. मुलगा प्रवासाला गेला. सासू-सासरे देवाला जात. भिक्षा मागून धान्य आणीत. सून स्वयंपाक करे, सासू-सासऱ्यांना वाढून उरलं- सुरलं आपण खात असे. श्रावण महिन्यात शनिवारी एक मुलगा आला. “बाई, मला न्हाऊ-माखू घाला.” सून म्हणाली, “बाबा ! घरामध्ये तेल नाही. तुला न्हाऊ कशानं घालू?”
“माझ्यापुरतं घागरीत तेल असेल. थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल. जेवू घाल.” सुनेनं घागरीत हात घालून तेल काढलं. त्याला न्हाऊ घालून जेवायला घातलं. उरलं-सुरलं आपण खाल्लं. असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून घेतले आणि जाते वेळी घरभर फेकून अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठा गुरानं भरला. धान्याच्या कोठ्या भरल्या, दासदासी आल्या,
सासू-सासरे देवाहून आले, त्यांना हे घर ओळखीचे वाटेना. वाडा हा कोणाचा ? सून दारात आरती घेऊन पुढं आली. “मामंजी, सासूबाई, इकडे या !”
सासूबाई म्हणाल्या, “अगं, तू कोणाच्या घरात राहिली आहेस ?” तिनं सर्व हकीगत सांगितली व म्हणाली, “तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले.” आरती करून त्यांना आत घेतलं. तिने गरीब असूनही तिच्या हातून होईल तेवढा तिने परोपकार केला. त्याचे पुण्य तिला मिळाले. मारुती प्रसन्न झाला, तसा तुम्हा-आम्हा होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफल संपूर्ण.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.