
Tej Police Times
रिद्धी-सिद्धी असे म्हटले, की आपण म्हणतो या तर गणपतीच्या पत्नी आहेत.पण तुम्हाला माहित आहे का आपल्याकडे दोन भार्या असणारे गणराज दक्षिणेत मात्र ब्रह्मचारी रुपात आहेत. आता तिथे काही ठिकाणी रिद्धी-सिद्धी बसतात बाप्पाच्या शेजारी पण त्या गणपतीच्या सकारात्मक शक्ती मानल्या जातात. शंभोशंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय असे चौघांचे कुटुंब पण मुलं मोठी झाल्यावर आई-वडिलांना त्यांच्या विवाहाची चिंता वाटू लागते अगदी त्याप्रमाणेच शंकर-पार्वती यांना मुलांच्या विवाहाची काळजी वाटू लागली. आपल्या मातापित्यांचा विचार ऐकून दोन्ही मुले माझा विवाह आधी होणार असे म्हणू लागले. शंभोमहादेव आणि पार्वतीला आश्चर्य वाटले. त्यांनी दोन्ही मुलांना सांगितले,’जो कोणी सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा करेल त्याचा विवाह आधी होईल.’ कार्तिकेय लगेच पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला पण गणपती बाप्पाने मातापित्यांना आसनावर बसवून त्यांची विधीवत पुजा केला आणि त्यांना प्रदक्षिणा घातली. माता-पित्यांना घातलेली प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ देते असे गणपतीने सांगितले. शंभोशंकर-पार्वती प्रसन्न झाले आणि त्यांनी हा प्रकार प्रजापती यांना सांगितला. गणरायांच्या बुद्धिचातुर्याने ते प्रभावित झाले आणि आपल्या कन्या सिद्धी आणि बुद्धी सोबत गणरायाचा विवाह लावून दिला. गणपतीला सिद्धीपासून क्षेम आणि बुद्धीपासून लाभ असे दोन पुत्र झाले. लोकपरंपरेत यांना शुभ आणि लाभ असे म्हणतात. गणपतीच्या विवाहाची ही कथा शिवपुराणात सांगितली जाते. गणपतीच्या भार्या म्हणून रिद्धि-सिद्धी असे म्हणतात पण काहीजणांच्या मते रिद्धी असे नाव नाही ते नाव आहे ऋद्धी. हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ आहे भरभराट आणि सिद्धि म्हणजे अलौकिक शक्ती होय.
गणपतीच्या विवाहाबद्दल अशी ही आख्यायिका सांगितली जाते, की गणपती तप करत असतात तिथून तुळस जात असते. ती गणरायांचे रुप पाहून मोहीत होते आणि विवाहाचा प्रस्ताव ठेवते पण गणपती ब्रह्मचारी असल्याचे सांगून नकार देतात तेव्हा तुळशीला राग येतो आणि ती शाप देत तुझा दोनदा विवाह होईल. यावर गणराय तुळशीला शाप देतात तुझा विवाह असुरासोबत होईल. म्हणून तुम्ही पाहिलं असेल गणपतीच्या पुजेत तुळस वापरत नाहीत. तसेच तुळशीने जेव्हा वृंदाचा अवतार घेतला तेव्हा तिचा विवाह जालंदराशी झाला होता.
रिद्धी-सिद्धी यांच्याबद्दल माहिती घेत असताना उरण येथील रिद्धी-सिद्धी विनायक देवस्थानाची माहिती मिळाली. हे मंदिर सहाशे ते सातशे वर्षे जुने असून मंदिरातील गणेशाची मूर्ती एकाच पाषाणात कोरलेली आहे. एकाच पाषणात गणपती आणि त्याच्या दोन बाजूंना रिद्धी-सिद्धी उभ्या आहेत, हे या मूर्तीचे वैशिष्टय आहे.
शिवपुराणात गणपतीच्या पत्नी म्हणून सिद्धी-बुद्धी असा उल्लेख आहे.तर ब्रह्मवैवर्तपुराणात सिद्धी आहे, पण बुद्धीची जागा पुष्टीने घेतली आहे.मत्स्यपुराणात रिद्धी आणि बुद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत असे सांगितलेले आहे. गणरायाच्या पत्नी रिद्धी म्हणजे विवेकाची देवी तर सिद्धी म्हणजे यशाची देवी आहे. स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळ्या रेषा रिद्धी-सिद्धीला दर्शवितात.आपल्या शास्त्रात आमोद आणि प्रमोद ही गणपतीची नातवंडे आहेत तर तुष्टी आणि पुष्टी या गणपतीच्या सुना आहेत असे ही म्हणतात.
गणपतीच्या विवाहाबद्दल माहिती घेत असताना तिथे कार्तिकेयचा उल्लेख सापडत नाही. कारण तो पृथ्वी प्रदक्षिणेला गेलेला असतो. तो पृथ्वी प्रदक्षिणा करुन येतो तेव्हा नारद मुनी त्याला गणपतीच्या विवाहबद्दल सांगतात. कार्तिकेय व्यथित होतो आणि घर सोडून जाण्याचा निश्चय करतो. माता-पिता त्याला समजावतात पण तो ऐकत नाही आणि क्रौच पर्वतावर निघून गेले. तेव्हापासून त्याचे कुमार हे नाव सगळीकडे प्रसिद्ध होते. ही कथा शिवपुराणात सापडते. पण ब्रह्मवैवर्तपुराणात मात्र कार्तिकेयचा विवाह होतो असे सांगण्यात आले आहे. ब्रह्मदेव कार्तिकेयचा विवाह देवसेना या सुंदर कन्येशी लावून देतात.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.