
Tej Police Times
अन्न हे पूर्ण ब्रम्ह किंवा अन्नावर उत्तम प्रक्रिया करून सुग्रास करून वाढणाऱ्या अन्नपूर्णेला नेहमी आनंदी समाधानी ठेवा असे नेहमी का म्हटले जाते. चला जाणून घेऊया
आपल्या देव्हाऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्की पाहिली असेल. हातात पळी घेवून असणारी ही देवी म्हणजे पार्वती माता होय. संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते. म्हणून दररोज घराघरात तिची पूजा केली जाते. आदी शंकराचार्यांचे अन्नपूर्णास्तोत्र तुम्ही वाचलं असेल त्यात तिचे सुंदर आणि अर्थपूर्ण वर्णन केलेले आहे. आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात. त्यामागे हा हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी, प्रार्थना करावी, ‘हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो. मी जो स्वयंपाक करते, त्यास रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून, सुंदर भावनेने अन्न बनविले आहे, त्यात सात्विकता येऊ दे. ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत. माझ्या मनात मातृभाव जागा होवो. आसपास कोणीही उपाशी राहणार नाही, याची मी काळजी घेवो. भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो.’ म्हणजेच काय तर तिने अन्नपूर्णेची सेवा, उपासना करून, उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते.
अन्नपूर्णा देवी संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. अन्नाचे महत्त्व शंभो शंकराला मान्य नव्हते. दोघांचा वाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली. पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपुर्णाच. तीच निघून गेल्यामुळे जगात सर्वत्र हाहा:कार माजला. अन्न नसल्यामुळे लोकांचे हाल सुरू झाले. शेवटी पार्वतीलाच दया आली आणि ती अन्नपूर्णेच्या रुपात काशीला अवतीर्ण झाली. तिने अन्नदान सुरू केले. भगवान श्रीशंकरालाही मधली सगळी परिस्थिती अनुभवाला आल्यामुळे अन्नाचे महत्त्व समजले आणि ते स्वतः पार्वतीकडे भिक्षा मागायला आले. अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळेच काशीला आहे. अन्नपूर्णा रुपाच्या उत्पत्तीबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते. भगवान शिव भिक्षेला गेलेला असताना एके दिवशी त्यांना भिक्षा मिळाली नाही. अर्थात, तसे घडावे ही नारदमुनींची योजना होती. नंतर पार्वतीने स्वादिष्ट अन्न वाढून शंकरांना तृप्त केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवांनी पार्वतीला ‘तू अन्नपूर्णा’ असा आशिर्वाद दिला.
आदि शंकराचार्य अन्नपूर्णा स्तोत्रात म्हणतात, ‘भिक्षां देही कृपावलम्बनकरि, मातान्नपूर्णेश्वरी”… म्हणजे ‘कृपेचा आधार देणाऱ्या हे माते अन्नपूर्णे, तू मला भिक्षा घाल’ अशा शब्दांनी या स्तोत्रातील प्रत्येक विचाराचा किंवा श्लोकाचा अंतिम भाग आढळतो. ही भिक्षा अन्नाची आहे तसेच ज्ञान वैराग्याच्या सिद्धीसाठीही आहे कारण सुयोग्य अन्न शरीराला मिळाल्यानंतर पुढील ध्येये उत्तम आणि बौद्धिक पद्धतीत पार पडते. जीवनात अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समस्त प्राणीमात्र अन्नाशिवाय जगू शकत नाहीत. अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवी उमेद सतत देत राहते. अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते. म्हणूनच अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. सर्वात श्रेष्ठ दान म्हणून अन्नदानाकडे पाहिलं जातं. तुम्हाला आठवत असेल कर्ण हा दानशूर होता पण त्याने अन्नदान केलं नाही म्हणून मृत्यूनंतर पुन्हा त्याला भूलोकी येवून अन्नदान करावे लागले असे सांगितले जाते.
जी महिला अन्न बनविते आहे तिची मनस्थिती समाधानी असली पाहिजे. तिने ते अन्न समाधानाने बनवले असले पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल अन्नपदार्थ एक असतो पण वेगवेगळ्या लोकांनी बनवला तर त्या अन्नाची चव वेगवेगळी असते. याचे कारणच हे की अन्न बनवणाऱ्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नात उतरत असते. म्हणून घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले गेले पाहिजे. असं म्हणतात तुम्ही जर मनापासून अन्नपूर्णेची उपासना केली तर तुमच्या हातून तयार होणाऱ्या पाककृती उत्तमच असतील. उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते. शुचिर्भूत होऊन आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे आणि ते वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे. त्या अन्नात प्रेम असते. म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते. केलेला स्वयंपाक हा आपण प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर केला तर तो अतिशय उत्तम होतो. म्हणूनच नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते.
आपल्याकडे सांगतात जेवणावर कधी राग काढू नये तो अन्नपूर्णेचा अपमान असतो. ज्या घरात अन्नाची नासाडी होते तिथे अन्नपूर्णा नाराज होते म्हणून अन्नाची नासाडी करू नका. उतू नका, मातू नका अन्नाची नासाडी करू नका असे केले तर अन्नपूर्णेची कृपा सदैव आपल्यावर राहिलं.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.