
Tej Police Times
पुणे, दि. ०३: भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे; भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भू, नौदल, वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

‘समर्थ भारत सक्षम सेना’ या प्रेरक संकल्पनेअंतर्गत दक्षिण कमांडच्यावतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे आयोजित ‘नो युवर आर्मी’ मेळाव्याच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक आंचल दलाल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल सतीश हंगे, माजी राज्य मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार विलास लांडे,आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या मेळाव्यात भारतीय सैन्यदलाच्या क्षमता आणि संरक्षण क्षेत्रात चाललेल्या स्टार्टअप आणि नवोन्मेषाचे सुरू असलेले प्रचंड काम पाहायला मिळत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय सैनिकांशी संवाद साधता येणार आहे, शिवाय युवकांना भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्या दृष्टीने प्रेरणा मिळणार आहे. भारत देशाने सरंक्षण क्षेत्रात सुरक्षितेच्या दृष्टीने निर्माण केलेल्या विविध अत्याधुनिक उपकरणांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्रीय संचार ब्युरोच्यावतीने आयोजित भारतीय सैन्याचे साहस, शौर्याच्या क्षमतेचे दर्शन घडविणाऱ्या बहुमाध्यम प्रदर्शनास भेट देवून माहिती जाणून घेतली. तसेच परिसरातील विविध संरक्षण विषयक अत्याधुनिक शस्त्रे, रणगाडे, उपकरणाची पाहणी करुन माहिती घेतली.
०००
Recover your password.
A password will be e-mailed to you.