
Tej Police Times
मुंबई, दि. ६ : रस्त्यांवरील अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘रस्ता सुरक्षा’ मोहीम राबविण्यात येते. यासाठी परिवहन व महामार्ग सुरक्षा विभागामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. नागरिकांनी रस्तासुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपले व इतरांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन महामार्ग सुरक्षा विभागाच्या पोलीस अधीक्षक रूपाली अंबुरे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रीमती अंबुरे यांची मुलाखत मंगळवार दि. ७, बुधवार दि. ८, गुरूवार दि. ९ आणि शुक्रवार दि. १० जानेवारी २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
रस्ता सुरक्षा ही आपल्या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब आहे. रस्ते अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण मोठे आहे. ही बाब विचारात घेवून केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत रस्ता सुरक्षा मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेच्या माध्यमातून रस्ते वाहतूक व महामार्ग रस्त्यांवरील सुरक्षितता सुधारण्यासाठी तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी स्पीडगनचा वापर करून अतिवेगावर नियंत्रण आणणे, हेल्मेटचा वापर करणे तसेच वाहतूक नियमावलीचे पालन करणे इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेची राज्यात करण्यात येणारी अंमलबजावणी याबाबत ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रीमती अंबुरे यांनी माहिती दिली आहे.
०००
Recover your password.
A password will be e-mailed to you.