तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

प्रत्येक जिल्ह्यात ‘गोटुल केंद्र’ स्थापन होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके – महासंवाद

0 23

गडचिरोली,(जिमाका),दि.23:आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलत आता प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी गोटुल केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आरमोरी येथे आयोजित गोटुल महोत्सव, सांस्कृतिक कला व क्रीडा स्पर्धेनिमित्त बोलताना ही घोषणा केली. यावेळी खासदार नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आ. रामदास मसराम उपस्थित होते.

डॉ. उईके म्हणाले की, “राज्य शासनाने आदिवासी समाजाच्या विकासासाठी व्यापक धोरण आखले आहे. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज गोटुल केंद्र स्थापन केले जाईल. आगामी सहा महिन्यांत आरमोरी येथे गोटुल केंद्राच्या भूमिपूजनासाठी मी स्वतः उपस्थित राहीन,” असा शब्द त्यांनी दिला.

डीबीटी प्रक्रिया सुलभ करण्याचे आश्वासन

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांरण (डीबीटी) सुलभ करण्यासाठीही शासनाने ठोस नियोजन केले असल्याचे मंत्री उईके यांनी स्पष्ट केले. “आता विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या खात्यात डीबीटी रक्कम थेट जमा होईल. यासाठी आंदोलनाची गरज भासणार नाही,” असे ते म्हणाले.

पेसा अंतर्गत पदभरतीचे नियोजन

पेसा योजनेअंतर्गत पुढील सहा महिन्यांत पदभरतीचे नियोजन करण्यात येत असून, त्याद्वारे आदिवासी समाजातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

आदिवासी समाजासाठी एकत्रित प्रयत्नांचे आवाहन

पक्षीय मतभेद विसरून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री उईके यांनी केले.

गोटुल महोत्सवाच्या निमित्ताने आदिवासी संस्कृती आणि कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाने स्थानिक नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.