Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नाशिक, दि. ३१ (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय विभागाने ई ऑफिस या संगणक प्रणालीचा वापर करतानाच १०० दिवसांच्या कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी पालक सचिव श्री. डवले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे आदी उपस्थित होते.
पालक सचिव श्री. डवले म्हणाले की, ई ऑफिस प्रणाली वापरास अत्यंत सुलभ आहे. त्याबरोबरच प्रत्येक विभागाला १०० दिवसांच्या कार्यक्रमांचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्याअंतर्गत दिलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटीवर अधिक भर द्यावा. जिल्ह्यात गुंतवणूक वाढीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे उद्योजकांसमवेत संवाद साधत उद्योगांना भेटी द्याव्यात. जिल्हा उद्योग मित्र समितीची नियमितपणे बैठक घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
तसेच संकेतस्थळांचे अद्ययावतीकरण, कार्यालयीन सुविधांचे अद्ययावतीकरण, अभिलेखांची वर्गवारी, पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी पालक सचिव श्री. डवले यांनी पशुसंवर्धन, ग्रामविकास, कृषी, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदासह विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी ई ऑफिस प्रणालीच्या वापरासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याची सूचना दिली. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी १०० दिवस अंमलबजावणी कार्यक्रमाची सविस्तर माहिती देतानाच आपले सरकार पोर्टल, उद्योग स्नेही धोरण, सातबारा उतारावरील कालबाह्य बोजा उतरविणे, ई ऑफिस, ई फेरफार नोंदींची माहिती दिली.
सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावा
पालक सचिव श्री. डवले यांनी नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन संबंधित विभागांनी नियोजन करावे. आवश्यक कामांना आतापासूनच सुरुवात करावी. सीसीटीव्ही यंत्रणा एआय आधारित असावी, असे सांगितले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
०००००