Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करावे- केंद्रीय खनिकर्म सचिव व्ही. एल.कांथा राव – महासंवाद

राज्यातील खनिज क्षेत्रांच्या ई-लिलाव कार्यान्वयनासाठी बैठक
मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र शासनाच्या खनिकर्म विभागाचे काम उत्कृष्ट असून मार्चपर्यंत विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील एक खाण नव्याने कार्यरत होणार असून आगामी वर्षात विदर्भातील सात नवीन खाणी सुरू होतील राज्यातील खनिज संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन आणि लिलाव प्रक्रियेनंतरची सर्व अंमलबजावणी विहित वेळेत पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय खाण मंत्रालयाचे सचिव व्ही. एल. कांथा राव यांनी दिले.
हॉटेल ताज येथे खनिकर्म विभागातर्फे खनिकर्म विभागातील विविध विषयांच्या अनुषंगाने केंद्रीय खाण मंत्रालयाचे सचिव व्ही. एल.कांथा राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राज्याचे खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.इकबाल सिंह चहल, विभागाचे महासंचालक डॉ.टी.आर.के. राव, खनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, खनिकर्म क्षेत्रातील उद्योजक यावेळी उपस्थित होते.
केंद्रीय सचिव व्ही. एल. कांथा राव म्हणाले की,२०१५ मध्ये प्रमुख खनिजाच्या खणक्षेत्राचे इ – लिलाव पद्धतीने वाटप सुरू झाल्यानंतर, महाराष्ट्र राज्याने आजअखेर एकूण ४० खाणक्षेत्राचा यशस्वीपणे ई-लिलाव केला असून, त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यात, चालू वर्षात एका खांणपट्ट्यातून उत्खनन आणि खनिजाची वाहतूक सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यातून राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होऊ शकणार आहे.
यावेळी खनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांनी विविध परवानग्यांसाठी लागणारा वेळ कमीत कमी असावा.यामुळे उत्खनन आणि वाहतुकीच्या प्रक्रियेत वेग येईल आणि शासनाला महसूल वाढीस मदत होईल, असे सांगितले. खनिकर्म विभागातील कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, राज्यातील खनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांनी दिलेल्या सूचनांवर गांभीर्याने विचार करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असे केंद्रीय सचिव व्ही. एल.कांथा राव यांनी सांगितले.
खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.इकबाल सिंह चहल यांनी खनिकर्म विभागाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीची यावेळी माहिती सादर केली. खनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांनी केंद्र व राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा यावेळी मांडल्या.