
Tej Police Times
देशात आणि महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आहेच. पश्चिम महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक कायम असला तरी राज्याच्या इतर भागात करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही निर्बंध पूर्णतः शिथिल न झाल्यामुळे जनता त्रस्त आहे. एक तर हे निर्बंध पूर्णतः काढून दिलासा द्यावा किंवा पूर्ण आणि कडक लॉकडाऊन करावे, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्याचं राजेश टोपे यांनी आज सांगितले. ते जालना इथं बोलत होते.
करोना: राज्यात आज ८,२९६ नव्या रुग्णांची भर; मृत्यू १७९
गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाची दुसरी लाट नियंत्रणात असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं करोना नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांना सूट द्यायलाही सुरुवात केली होती. मात्र तीनच आठवड्यात सरकारनं घुमजाव करत पुन्हा निर्बंध लागू केले. शहरांमध्ये नुकतेच सुरु होत असलेले मॉल्स आणि थिएटर्स पुन्हा बंद झाले. रात्रीपर्यंत सुरू असणारी दुकानं दुपारी ४ वाजता बंद करण्याचे निर्बंध लागू झाले. त्यामुळे व्यापारी वर्गात मोठी नाराजी पसरली आहे.
अजूनही काही जिल्ह्यांमध्ये करोनाची परिस्थिती गंभीर आहे, त्या भागात निर्बंध जाहीर करावेत. मात्र जिथं परिस्थिती नियंत्रणात आहे तिथे नागरिकांना उद्योग व्यापारासाठी पूर्ण परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी ही बाब मान्य केली असून यावर अभ्यास करून ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील, असंही टोपे यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या राज्यात अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असून याबाबत सरकारने ठरावही केल्याचं आरोग्यमंत्री म्हणाले. विधीमंडळात ठराव करून तो केंद्र सरकारला पाठवला असून लवकरच आपण नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही ते म्हणाले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.