
Tej Police Times
अनेक रस्त्यांवर पाणी आल्यामुळे चार राज्य मार्गासह बहुसंख्य जिल्हा मार्गही बंद झाले आहेत.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूर जिल्ह्यात गेले तीन दिवस जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्रभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. गुरुवारी दिवसभरही पाऊस धो धो कोसळत होता. या मुसळधार पावसामुळे नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले. बहुतेक सर्व धरणे भरत आली असून धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे अनेक रस्तेही बंद झाले आहेत.
कोणते रस्ते झाले बंद?
कोल्हापूर ते गगनबावडा, मलकापूर ते रत्नागिरी, कोल्हापूर ते राधानगरी, गडहिंग्लज ते गारगोटी या प्रमुख मार्गासह जिल्ह्यातील इतरही अनेक रस्ते बंद झाले आहेत. या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. यामुळे वाहतूक बंद झाली असून काही गावांची कोंडी झाली आहे.
जिल्ह्याला महापुराचा धोका
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नदी आता इशारा पातळी ओलांडून पाणी धोका पातळीकडे वाटचाल करत आहे. रात्री १० नंतर धोका पातळीही ओलांडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. ४३ फुटापेक्षा अधिक उंचीवरून पाणी वाहू लागल्यास जिल्ह्यात महापूर येतो. रात्री उशिरा नदीतील पाणी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.
चिपळूणमध्ये पुराच्या पाण्यातून साप, मगरी घरात; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
शहरात पंचगंगेचे पाणी पंचगंगा तालमीपर्यंत आले असून जयंती नाल्याचे पाणी रामानंदनगर,सुतार मळा व शाहूपुरी कुंभार वसाहत येथे शिरले. सकाळी अचानक घरात पाणी घुसल्यामुळे लोकांची त्रेधातिरपीट उडाली. अनेकांना बोटीच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाल्याने एनडीआरएफची दोन पथके दुपारी कोल्हापुरात दाखल झाले. चिखली, आंबेवाडी, कळे, बाजार भोगाव, वाघवे येथे या पथकाने मदत कार्य सुरू केले आहे. दुसरे पथक शिरोळ तालुक्यात पाठविण्यात आले आहे.
राधानगरी धरणातून १४२५ क्यूसेस पाणी बाहेर पडत असून इतर सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून नदीकाठच्या गावांतील लोकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरातील अनेक ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील जवळजवळ १०० पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. दिवसभरही मुसळधार पाऊस कोसळत होता. हा पाऊस असाच उद्यापर्यंत कोसळत राहिल्यास जिल्ह्यातील पूरस्थिती अतिशय गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे. पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.