Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उद्धव ठाकरेंचा वार शिंदे गटाच्या जिव्हारी; थेट माफीचे साक्षीदार होऊन कुंडली बाहेर काढण्याचा इशारा

7

गुवाहाटी : बुलढाणा येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. बोक्यांना खोक्यांची भूक लागली होती म्हणून राज्यात गद्दारी झाली, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव यांच्या या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. ‘कायद्यात माफीचा साक्षीदार म्हणून एक टर्म आहे. तुम्ही सतत असंच डिवचत राहिलात तर खोक्यातून, ट्रंकमधून कोणाला किती पैसे आले, हे अनेकजण माफीचा साक्षीदार बनून उघड करतील. त्यातून तुमचं खरं रूप जनतेसमोर येईल,’ असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका करताना दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंनाही लक्ष्य केलं आहे. ‘नाराज झालेले आमदार २०-२५ आमदार सुरुवातीला उद्धव ठाकरेंकडेच गेले होते. मात्र तुम्ही तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजू घेतली. तुम्ही हिंदुत्ववादी असल्याचं सांगता आणि तुमचा मुलगा अयोध्येला जाणारी रथयात्रा अडवणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला जाऊन भेटतो, सावरकरांविरोधात अपप्रचार करणाऱ्या राहुल गांधींना जाऊन मिठी मारतो, हे तुमचं हिंदुत्व आहे का? सहन करण्याची एक मर्यादा असते. मी सहनशील असेल, मात्र आमचे सर्वच ५० आमदार सहनशील नाहीत,’ असं म्हणत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला आहे.

तुम्ही ज्योतिषाला हात दाखवला, माझ्या शेतकऱ्याने कुणाला हात दाखवायचा? उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

‘शिंदेंनी तुमच्यावर जीव ओवाळून टाकला, पण…’

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वेळीवेळी अन्याय केल्याची भावनाही दीपक केसरकरांनी बोलून दाखवली आहे. ‘ज्या एकनाथ शिंदेंनी तुमच्यासाठी जीव ओवाळून टाकला होता, ते उपमुख्यमंत्री होतील म्हणून तुम्ही २०१४ नंतर शिवसेनेकडे आलेले उपमुख्यमंत्रिपदही लाथाडले होते. तुम्ही भाजपवर टीका करता, पण याच भाजपने तुम्हाला २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेत बिनशर्त पाठिंबा दिला होता. मग इतक्या वर्षांपासून महापालिकेत सोबत असणाऱ्या भाजपला कधीतरी महापौरपद द्यावं, असा विचार तुमच्या मनात का आला नाही?’ असा सवाल केसरकर यांनी विचारला आहे.

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना खिंडीत गाठलं; भर सभेत ऑडिओ क्लिप ऐकवत केली कोंडी

दरम्यान, शिंदे गटातील आमदार भविष्यात भाजपच्याच तिकिटावर निवडणूक लढवतील, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील सभेत केला होता. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, ‘आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर ठाम आहोत, म्हणून पक्ष सोडून गेलो नाहीत. नाहीतर दोन तृतीयांश आमदार होतो, ठरवलं असतं तर कोणत्याही पक्षात जाता आलं असतं, परंतु आम्ही तसं केलं नाही. बाळासाहेबांनी ही शिवसेना महाराष्ट्रासाठी निर्माण केली आहे, बिहारसमोर लोटांगण घालण्यासाठी नाही, हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवावं,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.