तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

मला राज्यपाल पदावरुन मुक्त करा, कोश्यारींची PM मोदींकडे इच्छा व्यक्त

0 53

मुंबई : नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतित करु इच्छितो, अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली.

“महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असं कोश्यारी यांनी सांगितलं.

माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

राज्यपालांना उशिरा सुचलेलं शहाणपण : मिटकरी

राज्यपाल कोश्यारींनी पदमुक्त व्हावं, ही महाराष्ट्राच्या जनतेची याआधीच इच्छा होती. महाराष्ट्र, मराठी माणसं आणि महापुरुष या सगळ्यांचा अवमान करुन झाला, त्यामुळे हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांच्या उद्घाटनांसाठी मुंबईत आले, त्यावेळी राज्यपालांचं वर्तन वेगळं होतं. त्यांनी याआधी जायला हवं होतं, पण ते लवकर राज्यातून गेले, तर महाराष्ट्र सुटकेचा निश्वास टाकेल, १७-१८ तारखेला हे सरकार कोसळलं, तर त्याआधीच आपण काढता पाय घ्यावा, असं त्यांना वाटलं असावं, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.