तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

मोठी बातमी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर

0 34

Koshyari resignation accepts | राज्यपाल कोश्यारी हे सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत होते. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी यांची गच्छंती अटळ मानला जात होती. महाविकास आघाडीने कोश्यारींच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

 

Bhagat Singh Koshyari
भगतसिंह कोश्यारी

हायलाइट्स:

  • भगतसिंह कोश्यारी परत जाणार
  • कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर
मुंबई: वादग्रस्त वक्तव्यांमुळे स्वत:ला आणि सरकारला सातत्याने अडचणीत आणणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्यं केल्यामुळे कोश्यारी अडचणीत आले होते. त्यामुळे विरोधकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. यानंतर भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्याजागी रमेश बैंस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सूत्रे स्वीकारतील.

गेल्या अधिवेशनात विरोधकांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन सभागृह डोक्यावर घेतले होते. येत्या काही दिवसांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. तेव्हादेखील महाविकास आघाडीकडून कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली असती. त्यापूर्वीच भगतसिंह कोश्यारी यांची इच्छा मंजूर करून त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

मोदींच्या मुंबई दौऱ्यावेळी व्यक्त केली होती इच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्याच महिन्यात मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळ भगतसिंह कोश्यारी यांनी मोदींकडे राज्यपाल पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मला आयुष्यातील उर्वरित काळ मनन आणि चिंतन करण्यात घालवायचा आहे. त्यामुळे मला राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली होती. तेव्हापासूनच कोश्यारी राज्यपाल पदावरुन कधी दूर होणार, याची चर्चा सुरु होती. त्यांना कोणत्याही क्षणी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन हटवले जाईल, अशी चर्चा होती.

कोश्यारी महाराष्ट्रातून निघून गेले तर आम्हाला आनंदच होईल: शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आतापर्यंत अनेकदा राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यपाल कोश्यारी सरकारच्या कारभारात हस्तक्षेप आणि अडवणूक करत असल्याचा आरोप सातत्याने होई. मात्र, कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झाली होती. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी, ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून महाराष्ट्राची सुटका झाली तर ती आनंदाची बाब ठरेल’, असे वक्तव्य केले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.