Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

NEP: ‘नव्या शिक्षण धोरणात कौशल्यावर भर’

8

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘वेगवेगळ्या विद्याशाखा एकत्रित शिकता याव्यात. आपल्या आवडीचे विषय निवडता यावेत. क्षमता, कौशल्य व ज्ञान यावर आधारित नवी शैक्षणिक प्रणाली येऊ पाहत आहे. या शैक्षणिक प्रणालीचे स्वागत आहे,’ असे विचार एसबीई सोसायटीचे अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी व्यक्त केले.

डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयाच्या वतीने तापडिया नाट्य मंदिर येथे दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाने ‘आत्मनिर्भर भारत व व्यवसायाभिमुख शिक्षण’ या विषयावर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्राचे आयोजन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. के. वासडीकर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि रामचंद्र भोगले प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर बीजभाषक व्ही. एम. व्ही. कॉलेजच्या (नागपूर), डॉ. कल्पना पांडे, प्रभारी प्राचार्य डॉ. सुनीता बाजपाई आणि आयोजक व इंग्रजी विभागप्रमुख डॉ. महानंदा दळवी उपस्थित होत्या. कुलगुरू येवले यांनीही विचार व्यक्त केले.

‘राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये स्थानिक संसाधने लक्षात घेऊन; तसेच जनसामान्यांना कळेल अशा स्थानिक भाषेस महत्त्व दिलेले आहे. याचा सकारात्मक परिणाम शिक्षण व्यवस्थेत दिसून येईल. हे शैक्षणिक धोरण राबवताना विद्यार्थी व प्राध्यापक यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. कारण आता जागतिक स्तरावरची स्पर्धा आहे. त्यासाठी परीक्षा पद्धतीतही बदल करणे, नियमित मूल्यमापन व्यवस्था सुरू करणे आवश्यक आहे,’ असे प्रमोद येवले म्हणाले.

‘नवीन शैक्षणिक धोरण राबवताना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधले पाहिजे. त्या प्रदेशाचे पारंपरिक ज्ञान, कौशल्य यांचा वापर करून शिक्षण देणे या व्यवस्थेत शक्य झाले आहे,’ असे कल्पना पांडे म्हणाल्या. ‘नवीन शैक्षणिक धोरणात व्यावहारिक ज्ञानावर ५० टक्के भर हे योजनेची एक जमेची बाजू आहे,’ असे जे. के. वासडीकर यांनी सांगितले. चर्चासत्राच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष डॉ. संज्योत आपटे आणि डॉ. मकरंद पैठणकर होते. दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष डॉ. अब्दुल राफे तर प्रवीण वक्ते होते.

संगीत विभागातील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन डॉ. ज्योती मोहंती यांनी केले. या वेळी प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांनी आपले शोधनिबंध सादर केले. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.