
Tej Police Times
‘आयसर’चे संचालक म्हणून डॉ. भागवत यांनी नुकताच पदभार स्वीकारला. शुक्रवारी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून ‘आयसर’च्या भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला. ‘आयसर’चे मावळते संचालक डॉ. जयंत उदगावकर, कुलसचिव कर्नल (निवृत्त) राजा शेखर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू आदी या वेळी उपस्थित होते.
‘नव्या शैक्षणिक धोरणामध्ये अभ्यासक्रमांच्या रचनांविषयी जे काही बदल सुचवले आहेत, त्या पैकी काही बदल यापूर्वीच ‘आयसर’मध्ये आत्मसात करण्यात आले आहेत. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, आंतरविद्याशाखीय शिक्षण अशा व्यवस्था ‘आयसर’मध्ये पूर्वीपासून उपलब्ध आहेत. यामुळे अभ्यासक्रमांच्या संचालनाचे वेगळे आव्हान ‘आयसर’पुढे नाही,’ असे डॉ. भागवत यांनी सांगितले.
‘आयसर’मध्ये संशोधनासाठी उत्तम व्यवस्था, यंत्रणा उपलब्ध आहेत. आम्ही सातत्याने त्या वाढवण्यावर भर देणार आहोत. विज्ञानाच्या नव्या शाखांमध्येही संशोधन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात मानव्यता विज्ञानावरही काही अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत,’ असेही ते म्हणाले. मूलभूत विज्ञानापासून ते डेटा सायन्सपर्यंत सर्व शाखांमध्ये शिक्षण देण्याचा ‘आयसर’चा मानस आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
काही दिवसांपूर्वी ‘आयसर’मध्ये शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. सुनील भागवत यांनी शुल्कवाढीचे काही प्रमाणात समर्थन केले. ‘परदेशातील संस्थाही शुल्कवाढ करतात. विद्यार्थ्यांना उच्चप्रतीच्या सेवा आणि सुविधा देण्यासाठी शुल्कवाढ करावी लागते. त्यामुळे गरजेनुसार शुल्कवाढ केली जाईल,’ असे डॉ. भागवत यांनी सांगितले.
‘करोना काळात ‘आयसर’ सारख्या संस्थांनी खूप काम केले. यामुळे करोनाचा प्रचंड ‘डेटा’ तयार झाला आहे. मात्र, हा डेटा प्रचंड असल्याने त्याचे सखोल विश्लेषण करणे खूप अवघड आहे,’ असे ‘आयसर’चे माजी संचालक डॉ. जयंत उदगावकर यांनी सांगितले. ‘या डेटाचे विश्लेषण करायचे असेल, तर त्याला मोठ्या संख्येने डेटा सायन्टिस्टची गरज भासणार आहे. करोना विषाणू समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही जीवशास्त्रज्ञांना डेटा विश्लेषणाचे ज्ञान आहे. मात्र, त्यांची संख्या कमी आहे,’ अशी खंतही उदगावकर यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एनसीईआरटी) अभ्यासक्रमातून डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत काढून टाकण्यात आला. यावर ‘आयसर’मधील तज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली. उत्क्रांती ही वस्तुस्थिती आहे. त्याबाबत अनेक समज गैरसमज आहेत. मात्र, उत्क्रांतीबाबत शास्त्रीय पुरावे आणि माहिती उपलब्ध आहे. ती डावलून कशी चालेल, असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला. ‘उत्क्रांतीचा सिद्धांत शिकवायलाच हवा,’ असे ठाम मत डॉ. जयंत उदगावकर यांनी व्यक्त केले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.