
Tej Police Times
विविध अभ्यासक्रमांना शिक्षण घेत असलेल्या संदीप विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या सत्रानंतर विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये न राहण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या सत्रासाठी वसतिगृहाचा लाभ घेतला, त्याचे शुल्क या विद्यार्थ्यांनी भरलेले आहे. परंतु वसतिगृह सोडून दोन महिने झाल्यानंतरही परीक्षा अर्ज भरताना या विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे.
उर्वरित सत्राचे वसतिगृह शुल्क न भरल्यास परीक्षा अर्ज भरू न देण्याचा फतवा विद्यापीठाने काढला असून, हे शुल्क भरण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे संबंधित विद्यार्थ्यांनी सांगितले. वसतिगृहाचे वर्षाचे शुल्क जवळपास एक लाख असून, ते सत्रानुसार भरण्याची सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. त्यानुसार एक सत्र संपल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये वसतिगृहात न राहू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क भरण्यास भाग पाडले जात आहे.
या प्रकाराबाबत विद्यापीठाशी यांच्याशी संपर्क साधला असता, विद्यापीठामध्ये येऊन चर्चा केल्यानंतरच यावरची भूमिका स्पष्ट केली जाईल असे सांगण्यात आले. ज्या सुविधेचा लाभच घेतलेला नाही त्याचे शुल्क भरण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर केली जात असून, परीक्षा तोंडावर असताना या प्रकारामुळे त्यांच्यावरील तणावही वाढला आहे.
दोन दिवसांपूर्वी गणवेश शुल्क भरण्याची सक्ती करीत विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात आले होते. त्यानंतर आता लगेच वसतिगृह शुल्कावरून विद्यार्थ्यांची कोंडी केली जात आहे.
– प्रवेश घेताना वसतिगृहाचे वर्षभराचे शुल्क भरण्याबाबत कोणताही नियम सांगितलेला नव्हता
– एक सत्र झाल्यानंतर पुढील सत्रात वसतिगृहात न राहण्याचा निर्णय घेतल्यावर ही चर्चा सुरू
– वसतिगृह सोडून दोन महिने झाल्यानंतर परीक्षा अर्ज भरताना अचानकपणे हा नियम लागू करण्यात आला
– बाहेर राहण्याचा खर्च व पुन्हा वसतिगृहाची फी भरावी लागल्यास पालकांवर मोठा आर्थिक बोजा पडणार
– याबाबत कोणतीही गोष्ट ऐकून घेण्यास प्रशासन तयार नाही
Recover your password.
A password will be e-mailed to you.