Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नववीच्या प्रवेशापासून अनेक विद्यार्थी वंचित

12

म. टा. वृत्तसेवा, डहाणू

सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आठवी उत्तीर्ण झालेल्या सुमारे दोन हजार ४०० विद्यार्थ्यांपैकी ९६५ विद्यार्थ्यांना इयत्ता नववीच्या वर्गात प्रवेश न मिळाल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. यंदा, २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात डहाणू तालुक्यातील इयत्ता आठवी उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या तीन हजार ७८ आहे. मात्र डहाणू आणि लगतच्या तालुक्यांमध्ये इयत्ता नववीसाठीच्या जागा कमी आहेत. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षातही शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे.

डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा या आठवीपर्यंतच आहेत. या शाळांमधून आठवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नववीच्या वर्गासाठी तालुक्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेत असतात. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्व आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नववीच्या वर्गात सामावून घेण्याएवढी या खासगी शाळांची क्षमता नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी नववीच्या प्रवेशापासून वंचित राहत आहेत. यापैकी बहुतांश विद्यार्थी हे आदिवासी समाजातील आहेत. गरीब, आदिवासीबहुल भागामध्ये प्रवेशापासून वंचित राहणे म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले जाण्यासारखे आहे. प्राथमिक शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षण न मिळाल्यामुळे शेकडो विद्यार्थांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे.

पालघर जिल्ह्यात आधीच विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण मोठे आहे. त्यात नववीच्या वर्गांमधील अपुऱ्या जागांमुळे इच्छा असूनही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. प्रवेश न मिळाल्यामुळे बालकामगार वाढत आहेत, एवढेच नव्हे तर बालविवाहाची समस्याही उद्भवत आहे. त्यामुळे या समाजाच्या प्रगतीला खीळ बसत आहे, याकडे जिल्हा परिषदेचे सदस्य काशिनाथ चौधरी यांनी लक्ष वेधले आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे प्रवेशाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी चौधरी यांनी डहाणूच्या साहाय्यक जिल्हाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी संजीता महापात्र यांना निवेदन दिले असून, इयत्ता नववीमध्ये प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी कायमस्वरूपी उपयोजना करण्याची विनंती केली आहे. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती स्नेहलता सातवी, जिल्हा परिषद सदस्य लतिका सातवी, माजी सदस्या जयश्री केणी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुश्रुत पाटील, सचिन भोनर, तवा सरपंच लहू बालशी यांनी कार्यालयात प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेतली.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्यांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. इयत्ता नववीत प्रवेश न मिळाल्याने पुढील शिक्षण थांबून विविध सामाजिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे प्रवेशाचे नियोजन योग्यरीत्या व्हावे, यासाठी विनंती करण्यात आली.

– काशिनाथ चौधरी, जिल्हा परिषद सदस्य

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.