
Tej Police Times
आचार्य संदीपन यांच्या आश्रमात कृष्ण आणि सुदामा एकत्र शिकत असत. सुदामाच्या साधेपणाने आणि सहजतेने कृष्णाला प्रभावित केले. दोघे खूप चांगले मित्र बनले. सुदामाला कृष्णाला भेटावयाची, बघावयाची इच्छा झाली. तो द्वारकेला आला. पहारेकरी सुदामाला आत जाऊ देईनात. सुदामा हे नाव कानी पडताच कृष्ण धावत आला आणि त्याने सुदाम्याला कडकडून मिठी मारली. प्रेमाने आत नेऊन आपल्या सिंहासनाशेजारी बसवले आणि विचारले, ‘काय भेट आणलीस माझ्यासाठी?’ कृष्णाला आवडणारे पोहे सुदाम्याने आठवणीने त्याच्यासाठी आणले होते. कृष्णाने अधाश्यासारखे ते पोहे मटकावले. कृष्ण-सुदाम्याच्या मैत्रीची ही कथा सर्वांनाच माहित आहे.
कर्ण आणि दुर्योधनाची मैत्रीही महाभारतातील मैत्रीचे उदाहरण देते. त्यांच्या गाढ मैत्रीच्या अनेक कथा महाभारतात प्रचलित आहेत. कर्ण हा दुर्योधनाचा परम मित्र होता. दुर्योधनाने कर्णाला राजपुत्र असलेल्या अर्जुनाच्या तुल्यबळ करण्यासाठी अंग देशाचा राज्याभिषेक केला. दुर्योधन आणि कर्ण यांच्या मैत्रीची ही सुरुवात मानली जाते. दुर्योधन संकटात असताना कर्णाने नेहमीच साथ दिली. दुर्योधनासारख्या वाईटाच्या मार्गी लागूनही त्याला अखेरपर्यंत न सोडणारा मित्र, त्याचा विश्वासघात न करणारा विश्वासू कर्ण.
श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे स्नेहमय संबंध प्रत्येकाला माहित आहेत. महाभारतात अर्जुनाला योग्य दिशा दाखवणारे आणि युद्धात युक्ती चातुर्याचा वापर करत अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारे देखील स्वत:श्रीकृष्ण होते. धनुर्धारी अर्जुनचाही आपल्या भावांपेक्षा कृष्णाच्या मैत्रीवर जास्त विश्वास होता. कृष्णाने आयुष्यभर त्याचे पालन केले. पुढे मैत्रीचे रुपांतर नात्यातही झाले. बलरामाची इच्छा नसतानाही, त्याने बहीण सुभद्राचा विवाह अर्जुनशी चातुर्याने लावून दिला. ही अशी मैत्री होती, ज्यात कृष्ण एक मार्गदर्शक, वाईट काळात मदत करणारा, सल्लागार, मित्र होता.
भारतीय पुराणांमध्ये आणखी एक मैत्री पवित्र मानली जाते. ती म्हणजे राम आणि सुग्रीवाची मैत्री. सीतेच्या अपहरणानंतर राम आणि लक्ष्मण शोधात भटकत ऋषीमुख डोंगरावर सुग्रीवाला भेटले. तेव्हा ते मैत्रीच्या अशा बंधनात बांधले गेले की आयुष्यभर निस्वार्थपणे एकमेकांना साथ देत राहिले. सुग्रीवाला भाऊ बालीने गैरसमजामुळे केवळ राज्यातून हाकलून दिले नाही तर त्याची संपत्ती आणि पत्नीपासूनही दूर केले. रामाने बालीचा वध करून सुग्रीवाला सर्वकाही मिळवून दिले. सुग्रीवाने वानरसेना आणि हनुमानाच्या मदतीने सीतेला शोधण्यात मदत केली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.