
Tej Police Times
गृहमंत्री असताना देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याचे निर्देश दिले होते, असा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपानुसार ‘ईडी’ने प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यामध्ये देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यकांना अटक करण्यात आली आहे. तसेच, देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची सुमारे साडेचार कोटी रुपयांची मालमत्तादेखील जप्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी चारवेळा समन्स बजावले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट असल्याने त्यांनी दरवेळी हे समन्स चुकवले. मात्र सर्वोच्च न्यायलायाने देशमुख यांना अंतरिम दिलासा देण्यास सोमवारी नकार दिला. त्यामुळेच ‘ईडी’ने पुन्हा एकदा देशमुख यांना मुंबईतील बॅलर्ड पीयर येथील कार्यालयात बुधवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले आहे. हे समन्स न पाळल्यास ‘ईडी’ कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे.
मुंबईतील बारमालकांकडून अनिल देशमुख यांना किमान ४० कोटी रुपयांची खंडणी मिळाल्याची ठोस माहिती ‘ईडी’कडे असल्याचे सांगितले जाते. त्याखेरीज त्यांनी खासगी बँकांमधून अनेक कर्जे घेतली. ही सर्व कर्जे वितरित करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. या नियमबाह्य कर्जाऊ रक्कमेचा वापर देशमुख यांनी बनावट कंपन्यांसाठी केला. त्यांनी ही रक्कम कुटुंबीयांच्या नावे वेगवेगळ्या कंपन्यांत गुंतवली, असे दिसून येत आहे. या सर्व चौकशीसाठी त्यांना समन्स बजाविण्यात आले आहे.
खडसेंच्या पत्नीलादेखील समन्स
पुण्याजवळील भोसरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी यांनादेखील ‘ईडी’ने मुंबईत चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे यांची चौकशी झाली आहे. तर त्यांचे जावई गिरीश चौधरी आधीच ‘ईडी’च्या कोठडीत आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.