तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

विवेक वारभुवनची मराठी वक्तृत्व स्पर्धेत बाजी; Dr. P. C. Alexander वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा पहिला नंबर

0 35

Mumbai University Achievement: राजभवनाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या माजी कुलपती डॉ. पी. सी. अलेक्झांडर राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय उत्स्फूर्त मराठी वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठास प्रथम क्रमांक मिळाला आहे. विवेकानंद एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील विवेक वारभुवन या विद्यार्थ्याने या उत्स्फूर्त मराठी वक्तृत्व स्पर्धेत बाजी मारली आहे.

(फोटो सौजन्य : मुंबई विद्यापीठ)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ११ ऑक्टोबर २०२३ रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ‘भारतीय परराष्ट्र धोरण: वास्तव आणि अपेक्षा’ या विषयावर ७ मिनिटाच्या निर्धारीत वेळेत विवेक याने उत्स्फूर्तपणे भाषण करून परिक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत राज्यातील १० विद्यापीठे सहभागी झाली होती. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव प्रा. सुनिल भिरूड यांनी विवेक वारभुवन याच्या यशाचे कौतुक करत त्याचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

(वाचा : Mumbai University: मुंबई विद्यापीठात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाची सुरुवात; दर तासाला १२०० लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया)

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कलेचे गुण वृद्धींगत करणे आणि विचार पटवून देण्याचे कौशल्य विकसीत करण्यासाठी राजभवनाच्या माध्यमातून माजी कुलपती डॉ. पी. सी. अलेक्झांडर राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ९ ऑक्टोबर २०२३ ला या स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई विद्यापीठात पार पडली होती. यामध्ये विविध २५ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्राथमिक स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्यास अंतिम फेरीसाठी म्हणजेच राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होता येते.

मराठी आणि इंग्रजी माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेली ही स्पर्धा नियमाप्रमाणे इंग्रजी माध्यमासाठी मुंबई विद्यापीठ आणि मराठी माध्यमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धेचे आयोजन मुंबई विद्यापीठात होत असून या स्पर्धेत २३ विद्यापीठे सहभागी होणार असल्याचे विद्यापीठ विकास विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

(वाचा : आता Li-Ion Battery Recycle करून वापरात आणणे सहज शक्य; मुंबई विद्यापीठातील नवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा जगाला होणार फायदा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.