तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

नाशिक युवा महोत्सव : पंतप्रधानांचे अन्न दिल्लीवरून येणार, अन्न सुरक्षेसाठी २२ अधिकारी

0 32

म. टा. खास प्रतिनिधी नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शहरात १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सावाला येणाऱ्या प्रत्येकाला सकस, ताजे व पौष्टिक अन्न मिळावे यासाठी अन्न औषध प्रशासनाने २२ अधिकाऱ्यांची टीम तयार केली आहे. ही टीम पंतप्रधानांच्या खानपानापासून ते युवा महोत्सवाला येणाऱ्या प्रत्येक घटकाच्या जेवणापर्यंत लक्ष देणार आहे.

नाशिक विभागाचे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांच्याकडे अन्न सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिक शहरात औषध अन्न विभागात अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने काही अधिकारी उत्तर महाराष्ट्रातून तर काही अधिकारी राज्याच्या इतर भागातून बोलवण्यात आले आहेत. मुख्य उद्‌घाटन कार्यक्रमानंतर पंतप्रधानांच्या खानापानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याची व अन्न पदार्थांची सुरुवातीला तपासणी होईल. त्यानंतर बंदोबस्तातच हे अन्न पदार्थ त्यांच्यापर्यंत पोहचेल. पंतप्रधानांचे अन्न दिल्लीवरून येईल. त्यासाठी त्यांची स्वत:ची यंत्रणा असते. या यंत्रणेला गरज भासल्यास नाशिकचे पथक काम करणार आहे. पंतप्रधानांना काय जेवण द्यायचे, याचा मेन्यू दिल्लीहूनच निश्चित करण्यात येणार आहे. तो एक दिवस आधी नाशिकमध्ये प्रशासनाला मिळण्याची शक्यता आहे. बहुतांश पदार्थ दिल्लीतून येतील. गरज भासल्यास नाशिकहून ते पुरवले जातील. फळांचा रस, सूप, सलाड, फॅट्स असे अन्नपदार्थ मोदी नेहमी सेवन करतात त्यानुसारदेखील तयारी करण्यात येत आहे.

मंत्री लग्नाला आले अन् जुनेच पाढे वाचून गेले! धर्मरावबाबा आत्राम यांची विभागीय आढावा बैठक ठरली फार्स

सर्व किचनवर देखरेख

युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी इतर राज्यातून साडेआठ हजार युवक येणार आहेत. त्यांच्यासाठी विविध ठिकाणी अन्न पदार्थ शिजवले जाणार असल्याने तेथील किचन सज्ज होत आहे. त्यासाठी देखील हे पथक तपासणी करणार असून, प्रत्येक पदार्थ या टीमच्या निगराणीखालून जातील. तसेच शहरात नऊ ठिकाणी कार्यक्रम होणार असल्याने त्याठिकाणी जाणारे अन्नदेखील तपासले जाणार आहे.

घसघशीत सवलतीवर आता FDAचे लक्ष; गरज पडल्यास औषध विक्रेत्यांवर कारवाईचे निर्देश

हॉटेलांची तपासणी

यानिमित्ताने नाशिक शहरात विविध राज्यांची पथके येणार आहेत. ते विविध हॉटेलांना भेटी देतील शहरातील प्रत्येक हॉटेलमध्ये येणाऱ्या नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे, यासाठी संपूर्ण शहरात विभाग केले असून, त्यावर निरीक्षकांची नेमणूक केली आहे. हे निरीक्षक त्या-त्या विभागातील प्रमुख हॉटेल्स रेस्टॉरंट यांची सतत तपासणी करणार आहेत. ज्या हॉटेलमध्ये काही अक्षेपार्ह आढळेल किंवा स्वच्छतेचा अभाव आढळेल अशा हॉटेलांना ताबडतोब सील लावण्यात येणार आहे.

हा संपूर्ण राज्याचा इव्हेंट असल्याने उत्तर महाराष्ट्राबरोबर इतर जिल्ह्यातूनदेखील अधिकारी बोलवण्यात आले आहेत. वेळोवेळी बैठका घेऊन त्यांना सूचना केल्या जात आहेत. महनीय व्यक्तींचे जेवण तपासण्यासाठी विशेष पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.

– संजय नारागुडे, सहआयुक्त, अन्न औषध प्रशासन

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.