Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कार्यक्रमात बोलण्याची संधी न दिल्याने शिंदे गटाचे आमदार नाराज; भरत गोगावले यांची सारवासारव

8

रायगड: अलिबाग येथे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मनोमिलनसाठी आयोजित करण्यात आलेल्या समन्वय मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन होण्यापूर्वीच नेत्यांमध्ये मनोमिलन झाले नसल्याचे चित्र मेळाव्यात कार्यकर्त्यांना पाहायला मिळाले. कर्जत विधानसभा आमदार महेंद्र थोरवे यांना भाषण करण्यास संधी दिली नसल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. यामुळे जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचे चित्र जिल्ह्यात समोर आलेलं आहे.

महायुतीच्या सरकारमध्ये नेते मंडळींचे मनोमिलन झाले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र मतभेद आहेत. ते काढण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये समन्वय साधून त्यांचे मनोमिलन करण्यासाठी आजचा हा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी शिवसेनेच्या आ. महेंद्र थोरवे यांना व्यासपीठावरून बोलण्याची संधी देण्यात आली नाही. यामुळे त्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली. शिवसेनेचे प्रतोद आ. भरत गोगावले यांनी सारवासारव करून आ. थोरवे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
अहमदनगरमध्ये महायुतीत चाललंय काय? मेळाव्यास अजितदादांच्या तीन आमदारांची दांडी, विखेंचं समन्वयकांकडे बोट
आज रविवारी अलिबाग येथे महायुतीचा समन्वय मेळावा संपन्न झाला. मेळाव्याला खा. सुनील तटकरे, खा. श्रीरंग बारणे, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र थोरवे, आ. महेंद्र दळवी, आ. रवींद्र पाटील, आ. प्रशांत ठाकूर माजी आमदार धैर्यशील पाटील, सुरेश लाड, तीनही पक्षाचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीच्या प्रत्येक पक्षातील तीन जणांना बोलायचे सांगण्यात आले होते. यामध्ये सेनेचे अलिबागचे आ. महेंद्र दळवी, आ. भरत गोगावले व खा. बारणे यांना बोलायला दिले. मात्र आ. थोरवे यांना डावलले. आ. गोगावले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

मात्र हे सगळे जाणीवपूर्वक केले असल्याचा आरोप आ. थोरवे यांनी महाराष्ट्र टाइम्स जवळ बोलताना सांगितले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप यांची युती अभेद्य आहे. मात्र राष्ट्रवादीला हिंदुत्व मुद्दा पटला पाहिजे, असे सांगून राज्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी तसे नियोजन करणे आवश्यक असून महायुतीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी नम्रता अंगी आणली पाहिजे, असा अप्रत्यक्ष खोचक टोला त्यांनी खा. तटकरे यांना लगावला.

महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाले नसल्याने स्थानिक निवडणुकांमध्ये याचा फटका बसला असल्याची यावेळी भावना व्यक्त केली. केवळ लोकसभा निवडणुकीपूर्ती मर्यादित महायुती नसावी तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक महायुतीने एकत्रित येऊन लढवाव्यात असा सूर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी लावला होता. जी-२० परिषद यशस्वी केल्याबद्दल विरोधकांनी पंतप्रधान मोदींचे साधे अभिनंदन केले नसल्याचे मत खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. आपला देश केवळ मोदींमुळेच पुढे जात असल्याचे कौतुकोउद्गार त्यांनी या मेळाव्यात काढले.

शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं? त्यांच योगदान काय ते त्यांनी सांगावं | नारायण राणे

महायुतीमध्ये १५ घटक पक्ष असून एकाच दिवशी ३६ जिल्ह्यात समन्वय मेळावे घेण्याचे काम सुरू आहे. या राजकीय पक्षाच्या समन्वयात आगामी निवडणूक लढविणार असल्याचे खा. तटकरे यांनी सांगून रायगड जिल्ह्याबद्दल बॅ. अंतुले यांचे स्वप्न महायुती पूर्ण करणार असल्याचे सांगितले. आगामी काळात महायुतीचे सरकार आणायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे असून जिल्ह्यातील सात आमदार आणि दोन खासदार मोठ्या फरकाने निवडून आणू शकतो. मात्र निवडून आल्यावर तुम्ही कोण आम्ही कोण असे वागू नका. तिघेही एकत्र असलो तर जनता आपले स्वागत करेल, असे आमदार भरत गोगावले यांनी यावेळी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.