
Tej Police Times

अॅडमिरल आर. हरी कुमार यांच्या निवृत्तीनंतर त्रिपाठी यांनी पदभार स्वीकारला. सध्या तांबडा समुद्र आणि एडनच्या आखातात हूती दहशतवाद्यांचे व्यापारी जहाजांवर हल्ले वाढल्याने जलवाहतुकीसमोर आव्हान निर्माण झाले आहे. या काळात त्रिपाठी यांनी नौदलाचे प्रमुखपद स्वीकारले आहे.
‘आतापर्यंत आपले नौदल युद्धसज्ज, एकसंध, विश्वासार्ह आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यास सक्षम असे दल म्हणून विकसित झाले आहे. त्यासाठी मी दलाच्या आजवरच्या सर्व प्रमुखांचे आभार मानतो. सागरी संरक्षण क्षेत्रातील नवीन आव्हाने लक्षात घेता, नौदलाने शांतताकाळात सागरातील संभाव्य संकटे रोखण्यासाठी आणि वेळ पडल्यावर सागरातील युद्ध जिंकण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. हेच माझे एकमेव लक्ष्य राहिल आणि त्यादृष्टीने मी प्रयत्न करेन,’ असे अॅडमिरल त्रिपाठी म्हणाले.
हिंदी महासागरात चीनच्या आक्रमकतेचे आव्हान भारतासमोर आहे. आत्मनिर्भरता, नवीन तंत्रज्ञानासाठीचे प्रयत्न अधिक बळकट करण्याचा, तसेच विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी नौदलाला देशाचा महत्त्वपूर्ण आधार बनवण्याचे प्रयत्न अधिक तीव्र करण्याचा मानस अॅडमिरल त्रिपाठी यांनी व्यक्त केला. दलातील मनुष्यबळाचा कौशल्यविकास, तसेच त्यांना सर्वोत्तम शस्त्रास्त्रे, प्रशिक्षण, व्यावसायिक वातावरण आणि प्रशासकीय सहाय्य देण्यास आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पदग्रहण सोहळ्याआधी अॅडमिरल त्रिपाठी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. रायसिना हिल्स येथील साउथ ब्लॉक येथील हिरवळीवर झालेल्या सोहळ्यात त्यांनी सन्मानगार्डची सलामी स्वीकारली.
१५ मे, १९६४ रोजी जन्मलेले दिनेश कुमार त्रिपाठी हे १ जुलै १९८५ रोजी नौदलात दाखल झाले. सैनिक स्कूल रेवा येथील माजी विद्यार्थी असलेले त्रिपाठी यांनी खडकवासला येथील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत लष्करी प्रशिक्षण घेतले. अॅडमिरल त्रिपाठी हे दूरसंवाद आणि इलेक्ट्रॉनिक युद्धकला या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांनी याआधी नौदलाचे उपप्रमुखपद, पश्चिम कमानचे प्रमुखपद, विनाश, त्रिशुल यांसारख्या युद्धनौकांचे प्रमुखपद भूषवले असून एडिमला येथील इंडियन नेव्हल अकादमीचे कमांडंट म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.