Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

काहीही झाले तरी घरातच खासदारकी, विजयवाड्यात भावांमध्ये झुंज, विजय तिलक कोणाच्या माथी?

8

अब्दुल वाजेद, विजयवाडा (आंध्र प्रदेश) : राजकीय डावपेचांनी अख्ख्या देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. राजकारणातील भाऊबंदकी नवीन नाही. महाराष्ट्रात तर त्याचा पुरेपूर प्रत्यय येतो. आंध्र प्रदेशही त्याला अपवाद ठरलेला नाही.

कृष्णा नदीच्या तीरावर वसलेला विजयवाडा लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी दोन भावांमध्ये यंदा थेट लढत होत आहे. मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये तेलगू देसम पक्षाची (टीडीपी) विजयी पताका घेणारे भाऊ केसीनेनी (नानी) श्रीनिवास यांनी टीडीपीची साथ सोडली आणि ‘वायएसआरएसपी’कडून उमेदवारी मिळवली. राजकीय डावपेचाचा भाग म्हणून मग ‘टीडीपी’ने श्रीनिवास यांचे भाऊ केसीनेनी (चिन्नी) शिवानाथ यांना उमेदवारी जाहीर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. या दोन नानी व चिन्नी बंधूंच्या युद्धात काँग्रेसकडून त्यांचे मावसभाऊ वल्लरी भार्गव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. विजयवाडाच्या नव्हे; तर कदाचित देशाच्या इतिहासात प्रथमच एकाच कुटुंबातील तीन जण एकमेकांविरोधात वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत असावेत.

विजयवाडा जिल्ह्याला एनटीआर जिल्हा म्हटले जाते. विजयवाडा सेंट्रल, तिरूवुरू, विजयवाडा वेस्ट, विजयवाडा ईस्ट, मिलावरम, नंदीगामा, जग्गाया पेटा आदी भागांचा समावेश होतो. कृष्णा नदीतीराच्या एका बाजूला डोंगररांगा आहेत. दुर्गा माता मंदिर, महात्मा गांधी म्युझियम पर्यटकांच्या गर्दीची ठिकाणे.

दोन भावांमधील लढतेची उत्सुकता जशी विजयवाडा मध्ये आहे, तशी आंध्र प्रदेश व तेलंगणमध्येही दिसते. स्थानिक माध्यमांमध्ये बंधूयुद्धाच्या कहाण्या वाचावयास मिळतात. उन्हाचा पारा ४०च्या वर केव्हाच पोचला आहे. सकाळी व सायंकाळी शहराच्या विविध भागांत प्रचारफेऱ्यांची गर्दी होते. समोर आलेल्यांना नमस्कार करून मतदार आपापल्या कामाला निघून जातात. दुर्गा माता मंदिराजवळ के. विजयराज भेटले. या वेळी कोण बाजी मारेल असे विचारले असता त्यांनी ‘या वेळी बदल होईल’, असे सांगितले. टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस दोघांमध्ये प्रमुख लढत आहे, जो आमच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन देईल त्याला मत देऊ. मागच्या काळात अनेक आश्वासने तशीच राहिल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
आंध्रात सत्तासंघर्ष नव्हे, तर अस्तित्वाची लढाई; जगनमोहन रेड्डी यंदाही गड राखतील?
मागच्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने २५ पैकी २२ जागा जिंकल्या होत्या. टीडीपी तीन जागांवर विजयी झाली होती. विजयवाडाने दोन निवडणुकांत टीडीपीलाच पसंती दर्शवली आहे. त्यामुळे यंदा हॅटट्रिक होणार की बदल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दोन टर्म खासदार असलेले चिन्नी वायएसआर काँग्रेसकडून मैदानात आहेत. ऐन वेळी टीडीपीचा उमेदवार विरोधी पक्षाचा उमेदवार झाला. त्यामुळे चंद्राबाबू नायडूंनी चिन्नी यांचा भाऊ नानी यांना उमेदवारी दिली. या दोन भावांमध्ये खासदारकीसाठी युद्ध गाजणार असे चित्र असताना काँग्रेसने नानी आणि चिन्नी यांचा मावस भाऊ वल्लरी भार्गव यांना उमेदवारी देऊन आणखी रंगत आणली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.