
Tej Police Times
काल रात्रीपासूनच मुंबई व उपनगरात पावसाची संततधार कायम आहे. आज पहाटेही मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. येत्या ३ ते ४ तासांत वेगवान वाऱ्यासह पाऊस बरसेल, अशा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याचबरोबर, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, नंदूरबार या जिल्ह्यांसाठीही पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे ठरणार आहेत.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, अहमगनगर, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच, याकाळात वाऱ्यांचा वेगही अधिक राहिल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. त्यामुळं शक्यतो नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नाशिकला पूराचा इशारा
नाशिक शहरातही गेल्या २४ तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे. गंगापूर धरणातून ५ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर, नाशिकच्या गोदा घाट परिसरात पुन्हा पाणी वाढलं आहे. रामकुंड परिसरात असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेला पाणी लागलं असून रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्यात गेली आहेत. संध्याकाळ नंतर आणखी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने, गोदा घाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज १२ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असून तो १५००० क्युसेक्स पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होणार आहे. नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असं आवाहन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.