तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Chabahar Port Deal: चाबहार बंदराबाबत भारत-इराणमध्ये महत्त्वाचा करार, जाणून घ्या या कराराबद्दल…

0 34

वृत्तसंस्था, तेहरान : सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे चाबहार बंदर दहा वर्षांसाठी विकसित करण्यासाठी भारत आणि इराण यांच्यामध्ये करार झाला आहे. त्यामुळे, दीर्घकालीन करारामुळे, भारताला इराणबरोबरच अफगाणिस्तान, मध्य आशियापर्यंतचा मार्ग खुला राहणार आहे.

भारताकडून चाबहार बंदराचा काही भाग विकसित करण्यात येत असून, त्याविषयी २०१६मध्ये करार झाला होता. त्यानंतर एकेक वर्षासाठी हा करार होत होता. आता दहा वर्षांसाठी येथील शाहीद बेहेश्ती टर्मिनल भारताच्या व्यवस्थापनाखाली येणार आहे. भारताचे जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि इराणचे रस्ते व नगरविकासमंत्री मेहरदाद बझारपश यांनी या करारावर सह्या केल्या.

सोनोवाल म्हणाले, ‘चाबहार बंदरासाठी करण्यात आलेला हा दीर्घकालीन करार सागरी क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. यातून, व्यापार, सागरी सहकार्य आणि जहाज वाहतुकीच्या नव्या युगाची सुरुवात होणार आहे. यातून, भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापाराला प्रोत्साहन मिळणार आहे. चाबहार बंदर प्रकल्पामध्ये भारतीय गुंतवणूक सुरूच राहणार असून, त्यातून या विभागातील आर्थिक विकासासाठी भारत कटिबद्ध असल्याचे पुन्हा सिद्ध होईल.’

या करारानंतर भारताची ‘इंडिया पोर्ट्स ग्लोबल लि.’ ही कंपनी १२ कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे; तसेच चाबहारशी संबंधित पायाभूत प्रकल्प विकसित करण्यासाठी २५ कोटी डॉलरपर्यंत कर्जपुरवठाही करण्यात येणार आहे.

चाबहारचे महत्त्व

– ओमानच्या आखातामध्ये चाबहार बंदराचे स्थान सामरिक दृष्टीने महत्त्वाचे आहे.
– अफगाणिस्तान व मध्य आशियातील देशांच्या व्यापारासाठी या बंदराचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.
– भारताने आतापर्यंत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली असून, सुविधाही वाढवल्या आहेत.
– अफगाणिस्तान व मध्य आशियातील देशांशी व्यापार वाढविण्यासाठी व्यवहार्य मार्ग उपलब्ध झाला आहे.

भारत आणि इराण यांच्यातील संबंधांमध्ये ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘वसुधैव कुटुंबकम’ या विचारातून हे संबंध विकसित झाले आहेत. भारत आणि इराण यांच्यातील विश्वास व भागीदारी वाढत आहे, याचे हे लक्षण आहे.- सर्वानंद सोनोवाल, जहाजबांधणी मंत्री
Hardeep Singh Nijjar: निज्जर हत्याप्रकरणी चौथा भारतीय अटकेत, कॅनडा पोलिसांची कारवाई
अफगाणिस्तानची मदत वाढली

चाबहार बंदरामुळे भारताकडून अफगाणिस्तानला जाणारी मदत वाढली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या बंदरातून २५ लाख टन गहू आणि दोन हजार टन डाळींचा पुरवठा अफगाणिस्तानला करण्यात आला आहे; तसेच ४० हजार लिटर कीटकनाशकेही येथून पाठविण्यात आल्याचे सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.