
Tej Police Times
मुंबई, दि.29 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयात पीक विमा भरणे प्रक्रिया सुरु आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाच्या वर अवैधरित्या काही आगाऊ रकमा वसूल करत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आगाऊ पैसे वसूल करणाऱ्या केंद्र चालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असून अशा लोकांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
मंत्री श्री. मुंडे यांनी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागणाऱ्या सीएससी केंद्र चालकांची शक्य असेल त्या पुराव्यासह राज्य शासनाचा कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 9822446655 या क्रमांकावर व्हॉट्सअप द्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी, असे आवाहन केले आहे. अशा केंद्र चालकांवर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल.
शेतकऱ्यांना पीक विम्याचा एक अर्ज भरण्यासाठी एक रुपया इतकीच रक्कम पोर्टलवर भरणे अपेक्षित आहे, तर यासाठी संबंधित केंद्र चालकाला शासनाकडून प्रति विमा अर्ज 40 रुपये मानधन दिले जाते. मात्र, काही केंद्र चालक सात-बारा ऑनलाइन काढणे, पेरणी प्रमाणपत्र यासारख्या बाबींच्या नावाने शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागत असल्याच्या तक्रारी येत आहेत, या विरोधात आता मंत्री श्री. मुंडे यांनी कडक भूमिका घेतली आहे.
000000
दत्तात्रय कोकरे/विसंअ
Recover your password.
A password will be e-mailed to you.