तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

वरुणराजाची मुंबईकडे पाठ, उन्हाचा तडाखा वाढला, पुढील दोन दिवसही उकाड्याचे

0 83

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबई तसेच लगतच्या परिसरामध्ये ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांत फारसा पाऊस न पडल्याने तापमानाचा पारा चढा आहे. सरलेल्या आठवड्यात दोन वेळा मुंबईचे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या वर गेले. शुक्रवारनंतर रविवारी पुन्हा एकदा कमाल तापमान ३३ अंशाहून जास्त होते. रविवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३३.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

रविवारी सांताक्रूझ येथे नोंदले गेलेले कमाल तापमान हे सरासरीपेक्षा ३.६ अंशांनी अधिक होते. कुलाबा येथे ३२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमानही सरासरीपेक्षा २.६ अंशांनी अधिक होते. आर्द्रतेच्या अधिक प्रमाणामुळे मुंबईतील किमान तापमानही चढे आहे. सांताक्रूझ येथे २७.४ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. राज्यातील रविवारी नोंदले गेलेले हे सर्वाधिक किमान तापमान होते.
Mumbai News: निम्मे भूखंड नूतनीकरणाविना; मुंबई महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल अडला
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडूनही तापमान चढेच आहे. पुणे केंद्रावर सरासरीपेक्षा ६.५ अंश, तर लोहगाव केंद्रावर सरासरीपेक्षा ७.१ अंशांनी कमाल तापमानाचा पारा चढा होता. साताऱ्यातही कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ६.१ अंशांनी अधिक नोंदवला गेला. उत्तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी, तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात चार ते सात अंशांपर्यंत अधिक होते. मराठवाड्यातही तीन ते चार अंशांनी सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान रविवारी नोंदले गेले. विदर्भात गोंदिया वगळता उर्वरित केंद्रांवर कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा तीन ते पाच अंशांनी चढा आहे.
Hydropower : राज्यात वीजेची कमतरता भरुन निघणार, पंप स्टोरेज पद्धतीने वीजनिर्मितीला चालना; पवना अर्जुनेवर जलविद्युत प्रकल्प

काहिली कायम राहणार

सध्या जाणवत असलेली उन्हाची काहिली संपूर्ण महाराष्ट्रभर मंगळवारपर्यंत कायम राहिल, तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन ते सहा अंशांपर्यंत अधिक जाणवू शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशीव अशा २१ जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा पाच ते सहा अंशांनी अधिक जाणवण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. उर्वरित मराठवाडा व संपूर्ण विदर्भातील १५ जिल्ह्यांत हे तापमान सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांनी अधिक जाणवू शकते. पावसाळ्याच्या काळातील अरबी समुद्रावरून, पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलून हे वारे सध्या उत्तरेकडून येत आहेत. बाष्पयुक्त वारे वाहत नसल्याने पावसामध्ये खंड पडला आहे. वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि हवेचे गाठोडे निर्माण होऊन त्यातून उष्णतेचे संचयन होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्री जमिनीतून आकाशात सामावू शकणाऱ्या उष्णतेलाही सध्या अटकाव होत आहे. पर्यायाने संचित झालेली ही उष्णता काहिलीला मदत करत आहे, अशीही माहिती खुळे यांनी दिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.