Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मला समजवू नका, ठाकरेंना आधी बाहेर काढा, राजकोट किल्ला राड्यावेळी नितेश राणेंचा पोलिसांना दम

10

सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीचे नेते मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी पोहोचले, त्याच्या काही मिनिटं आधीच खासदार नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र, माजी खासदार निलेश राणेही दाखल झाले होते. त्यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. राजकोट किल्ल्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

केंद्रीय मंत्री नारायण राणे मालवण किल्ल्यावर पाहणीसाठी दुपारी बारा वाजताच्या सुमारास दाखल झाले. त्यावेळी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवारही उपस्थित होते. दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केले आणि राणे पुढे निघाले. त्याच वेळी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेही किल्ल्यावर पाहणीसाठी पोहोचले. त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, विनायक राऊत, आमदार वैभव नाईकही होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मेहबूब शेखही तिथे होते.
१५ मिनिटांत ताकद दाखवू! राणे-ठाकरे समर्थक भिडले; राजकोट किल्ल्यात राडा, जोरदार घोषणाबाजी
यावेळी निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना बाहेर काढा, असं पोलिसांना सांगितलं. मला समजवायचं नाही, त्यांना आधी बाहेर काढा, आम्ही स्थानिक आहोत, ते नंतर आले, असं निलेश राणे म्हणाले. त्याचवेळी ठाकरेंचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यांच्यात बाचाबाची सुरु झाली. याला काही काळातच हिंसक वळण लागलं. राणे समर्थकांकडून ‘पेंग्विन-पेंग्विन’च्या घोषणा सुरु झाल्या, तर आदित्य ठाकरेंनीही ‘आम्ही कोंबड्या घेऊन आलो नाही’ असं म्हणत डिवचलं.
Supriya Sule: ‘आमच्या नेत्यांच्या केसालाही धक्काही लागला, तर याद राखा’, सिंधुदुर्ग राड्यावर सुप्रिया सुळे संतापल्या
आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावर ठिय्या मांडला. ठाकरे आणि राणे यांच्या समर्थकांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिलं. आम्ही चोरमार्गाने जाणार नाही, राणेंना बाहेर जायला सांगा, नंतरच आम्ही मुख्य मार्गाने निघू, असं विनायक राऊत म्हणाले. तर राणे समर्थक हे आदित्य ठाकरेंना बाहेर काढण्याच्या मागणीवर ठाम होते. जोरदार राड्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना किल्ल्यावरुन हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणावरुन शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने मोठं आव्हान निर्माण झालं. अखेर जयंत पाटील आणि नारायण राणे यांनी बातचित करत मध्यस्थीचा प्रयत्न केला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.