
Tej Police Times
शरद पवार म्हणाले की, मधल्या काळात काही लोक पक्ष सोडून गेले पण तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे. यापूर्वी देखील निवडून आलेले 60 आमदारांपैकी 54 लोक पक्ष सोडून गेले होते. त्यानंतर आपण नव्याने पक्षाची बांधणी केली तेव्हा जे 54 लोक पक्ष सोडून गेले त्या सर्वांचा पुढील निवडणुकीत पराभव झाला हा इतिहास आहे. यामुळे पक्ष गेला, पक्षाचे नाव गेलं, पक्षातील माणसे गेले, पक्षातील आमदार गेले पण अशा परिस्थितीत आपण निवडणुकीला सामोरे जायचं ठरवले आहे. पक्षाशी बांधिलकी न ठेवणाऱ्यांचा मतदार जो निकाल घ्यायचा तो घेतात. यंदा लोकांनी निर्णय घेतलाय या वेळेला भाजपा आणि तिकडे पळून गेलेल्या लोकांच्या बाजूने उभे राहायचे नाही. त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन अटळ आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापुरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
Supriya Sule : मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांची उद्धव ठाकरेंना पसंती
लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी कंबर कसली आहे. गेल्या तीन दिवसांपासून शरद पवार कोल्हापुरात तळ ठोकून विविध राजकीय जोडण्या आणि रणनीती आखत असून यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढत आहे. महायुती मधील अनेक नाराज नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली असून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीची ही मागणी करण्यात येत आहे. या सर्व संदर्भात कार्यकर्त्यांच मत जाणून घेण्यासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी कोल्हापूर उत्तर ,कागल, चंदगड, राधानगरी, हातकणंगले या जागांवर आपण दावा सांगावा असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले. तसेच अजित पवार गटात गेलेले मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुढे येऊ दिले नाही अशी टीका केली. मात्र यापुढे शरद पवार यांच्यासाठी जीवाचं रान करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आमदार करणार असा निश्चय यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
शरद पवार पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाने किती जागा लढवायचा याचा कोणताही निर्णय झालेला नाही. ही महाविकास आघाडी आहे. यामधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षातील नेते एकत्र बसून जागावाटपचा निर्णय घेण्यात येईल. जर जागा वाटपात तिढा निर्माण झाला तर हायकोर्टात चर्चा होईल. तिथेही वाद मिटला नाही तर अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टात नक्की होईल, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही.असे शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली असून हे सरकार सर्वसामान्यांच नाहीतर भ्रष्टाचारी आहे असं म्हणाले आहेत. सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. वाऱ्याच्या वेगाने हा पुतळा पडला असं सरकार म्हणत आहे. मात्र या सरकारने पुतळा बसवत असताना भ्रष्टाचार केला अशी चर्चा लोकांच्या सुरू आहे. लोक सगळं सहन करतील पण छत्रपती शिवाजी महाराजांची अप्रतिष्ठा कधीही मान्य करणार नाहीत असे शरद पवार म्हणले आहेत. तसेच निवडणूक अवघ्या 50 ते 55 दिवसांवर आलेली आहे. ज्या जागा आपल्याला मिळतील त्या ठिकाणी उत्तम उमेदवार देण्याचा प्रयत्न आपला राहिल. इथून पुढचे राज्य आपल्या लोकांच येणार आहे. प्रगती, विकास आणि स्वाभिमानी जनतेचे राज्य यापुढे महाराष्ट्रात येईल याचा विश्वास मला आहे. असे पवार म्हणाले आहेत.
लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.