
Tej Police Times
ज्या प्रमाणे देवी देवता आपल्या घरी येतात त्याचप्रमाणे पितृपक्षात आपले पूर्वज आपल्या घरी येतात. घरातील उत्तम स्थिती पाहून आनंदीत होत, आशिर्वाद देतात. हा काळ काहीजण अशुभ मानतात पण असे नाही कारण आपले पूर्वज आपल्या भल्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यांचे आशिर्वाद नेहमीच आपली भरभराट करत असतात. पितृपक्ष, श्राद्धविधी, तर्पण ही परंपरा रामायण, महाभारतापासून सुरु आहे. महाभारताच्या शिस्त पर्वात सर्वांत प्रथम झालेल्या श्राद्ध विधीबाबत वर्णन आढळते. यानुसार, महातपस्वी अत्री ऋषींनी सर्वप्रथम श्राद्ध विधी केल्याचे नमूद केले आहे. अत्री ऋषींनी महर्षी निमि यांना श्राद्ध विधीबाबत उपदेश केला होता. यांनतर गुरुने दिलेल्या उपदेशानुसार, महर्षी निमि यांनी श्राद्ध विधी केला. महर्षी निमि यांनी केलेला श्राद्ध विधी पाहून अन्य ऋषी आणि मुनींनी आपापल्या पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण केले. नियमितपणे केल्या गेलेल्या या विधीमुळे देवता आणि पूर्वज तृप्त झाले.
ऋषी आणि मुनींकडून नियमितपणे श्राद्ध विधी केला जात होता मात्र सतत अन्न आणि पाणी ग्रहण केल्यामुळे देवता त्रस्त झाल्या. यामुळे अपचनासह अनेक समस्या त्यांच्यासमोर उत्पन्न झाल्या. देवतांना यातून मार्ग सापडत नव्हता. अखेर सर्व देवता ब्रह्मदेवांकडे गेल्या आणि त्यांनी आपल्या चिंतेचे विवेचन केले. ब्रह्मदेवांनी शांतपणे सगळे ऐकून घेतले आणि या समस्येवर अग्निदेव तोडगा काढू शकतील असे सांगितले.
ब्रह्मदेवांच्या सांगण्यावर आपली समस्या घेऊन देवता आणि काही पूर्वज अग्निदेवांकडे गेल्या. अग्निदेव म्हणाले की, चिंता सोडावी. आता आपण सर्व एकत्र मिळून श्राद्ध विधीवेळी अर्पण केले जाणारे अन्न आणि पाणी ग्रहण करू. अग्निच्या प्रभावामुळे तुमची समस्या दूर होईल. समस्येवर समाधान मिळाल्याने सर्व देवता प्रसन्न झाल्या. अग्नि तत्त्वामुळे अन्नपचन सुलभ होते म्हणून तर श्राद्ध विधी करताना सर्वप्रथम अग्निदेवतेला अन्न आणि पाणी अर्पण केले जाते. यानंतर देवतांना आणि त्यानंतर पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी केला जातो, असे सांगितले जाते.
शास्त्रानुसार श्राद्ध विधी करताना हवन केले जाते. यावेळी पूर्वजांच्या नावाने पिंडदान केले जाते. तिथे ब्रह्मराक्षसही येवू शकत नाही कारण अग्निदेवांमुळे ब्रह्मराक्षस दूर पळून जातात. अग्निमुळे सर्व गोष्टी पवित्र होतात. पवित्र झालेले अन्न पाणी ग्रहण केल्यामुळे देवता आणि पूर्वज प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे. म्हणूनतर महालय श्राद्धात अर्घ्यदान, पूजा, अग्निकरण, पिंडदान आदी अनेक विधी केले जातात.
श्राद्ध विधी करताना सर्वप्रथम वडिलांच्या नावाने मग आजोबांच्या नावाने आणि त्यानंतर पणजोबांच्या नावाने पिंडदान केले जाते. शास्त्रांमध्ये अशाच क्रमाने पिंडदान करावे, असे सांगण्यात आले आहे. ज्या पूर्वजाच्या नावाने पिंडदान विधी केला जातो, तेव्हा एकाग्रचित्ताने गायत्री मंत्राचे पठण करावे. गायत्री मंत्रासह ‘सोमाय पितृमते स्वाहा’ या मंत्राचा जप करावा, असे सांगितले जाते. महाभारतात तीन पिंडदानाबाबत सांगितले आहे. पूर्वजांच्या नावाने पिंडदान केले तर सर्व मनोकामना पूर्ण होतात असेही म्हटले आहे.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.