Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Navaratri 2024 : नवरात्रीत गरबा का खेळला जातो? गरब्याची उत्पत्ती कशी झाली? जाणून घ्या आध्यात्मिक कारण
Garba Dance Cultural Significance: नवरात्र असे म्हटले की आदीशक्ती, महिषासुरमर्दिनी, शक्तीची देवी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. नऊ दिवस भक्तगण मातेची उपासना करतात. या नवरात्रीमधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरबा किंवा दांडीया. आता आपल्याकडे गरबा-दांडीया यांना व्यावसायिक स्वरुप प्राप्त झालं आहे पण हा गुजराती लोकांचा सांस्कृतिक वारसा आहे. सामुहिक पद्धतीने आनंद साजरा करण्याचे साधन आहे. तसेच हे एक भाग्य आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. दरम्यान नवरात्रात गरबा का खेळतात याबद्दल अधिक जाणून घेवूया.
मानवी जीवनातील दैवी शक्तीची उपासना
“नवरात्र” म्हणजे मातेच्या नऊ रूपांची उपासना असते. प्रत्येक प्रांतात नवरात्र वेगळ्या पद्धतीत साजरी केली जाते. दरम्यान नवरात्रात गरबा आणि दांडिया आवर्जून खेळला जातो. महिला आणि पुरुष खास पेहराव परिधान करून दुर्गामातेचा जागर करतात. गरबा, दांडियासाठी फेर धरला जातो. गरबा म्हणजे पारंपरिक लोकनृत्य असून स्त्रीमधील दैवी स्वरूप, सृजनशीलता आणि जीवनातील वर्तुळाचे प्रतीक आहे. “गरबा” हा शब्द संस्कृतमधील “गर्भ” या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ “गर्भाशय” असा होतो. पारपंरिक गरबा नृत्यू जर तुम्ही पाहिला असेल तर तो जाळीदार मातीचा घट आणि त्यात प्रज्वलीत असणारा दिवा या भोवती सादर केला जातो. त्या दिव्याला “गर्भदीप” असे म्हणतात. तो घट म्हणजे शरीराचे प्रतीक आणि ज्यामध्ये प्रज्वलीत असणारा दिवा म्हणजे दैवी शक्ती असे म्हटले जाते. या गर्भदीपाभोवती नृत्य करणे म्हणजे मानवी जीवनातील दैवी शक्तीची उपासना करणे असा होतो. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की गर्भदीपाच्या जागी मध्यभागी दुर्गामातेचं चित्र ठेवलं जातं.
गरबा दैवीशक्ती आणि जीवनातील चक्राचे प्रतीक
गरबा सादर करताना फेर धरला जातो. एक वर्तुळ करून गरबा, दांडिया साजरा करतात. जेव्हा जास्त लोक असतात त्यावेळी अधिक वर्तुळांमध्ये नृत्य सादर केलं जातं. हे चक्र म्हणजे काळाचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात चक्राला फार महत्त्व आहे. आपल्या शरिरात सात चक्र असून ती शरीरातील तांत्रिक केंद्र मानली जातात. जीवनाच्या चक्रात जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म यांचा समावेश असतो आणि हे चक्र सतत फिरत असते. पण यामध्ये एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे मातेची दैवी शक्ती. हा गरबा त्या गोष्टीचे प्रतीक आहे. नऊ दिवस आपण मातेचा जागर करतो, तिची उपासना करतो. गरब्यामधून फेर धरत असतो आणि जणू काही सांगत असतो की, हे जग सतत बदलत आहे पण स्त्रीरूपातील देवता ही अविचल आणि शाश्वत गोष्ट आहे.
गरबा खेळताना तीन टाळ्या का वाजवतात?
गरबा खेळताना महिला तीन टाळ्या वापर करतात त्याबद्दल असे सांगितले जाते की या तीन टाळ्या त्रिदेवाला समर्पित आहेत. पहिली ब्रह्मदेवाला, दुसरी भगवान विष्णूला आणि तिसरी शंभूमहादेवाला असे सांगितले जाते. तीन टाळ्यांच्या कडकडाटात म्हणजे तीनही देवतांचे आवाहन असते. गरब्याच्या नृत्यात उमटणाऱ्या आवाजाने आणि तरंगांनी अंबामाता जागृत होते असे ही म्हणतात. गरबात खेळताना आपल्यात एक उत्साह आणि ऊर्जा असते. जीवनातील नकारात्मकता नष्ट होवून सकारात्मक येते.
गरबा अनवाणी का खेळला जातो?
“गरबा” हा धार्मिक प्रथेचा एक भाग आहे आणि जिथे धार्मिक गोष्टी येतात तिथे अनवाणी राहून कार्य केले जाते. हा तर साक्षात दुर्गा मातेचा जागर आहे, जी आदीशक्ती आहे. समस्त देवता जिच्यापुढे नतमस्तक होतात. तिची उपासना अनवाणी राहून केली जाते. गरबादेखील अनवाणी खेळला जातो. त्याचे आणखी एक कारण म्हणजे पृथ्वीबद्दल आदर व्यक्त करणे. पृथ्वी जी आपला भार वाहते आहे. तिच्यात सृजनशीलतेची शक्ती आहे, त्या शक्तीचा स्पर्श आपल्याला व्हावा. तिचा आशिर्वाद मिळावा म्हणूनही गरबा अनवाणी साजरा केला जातो. आपण सदैव पायात काही ना काही परिधान करत असतो, त्यामुळे जमीनाला स्पर्श होत नाही. नवरात्रीच्या काळात पृथ्वीमधील सर्जनशीलता, जीवनदायी ऊर्जा मनुष्यात पोहोचण्याचा मार्ग म्हणजे अनवाणी राहून मातेची उपासना करणे.