
Tej Police Times
गेल्या दहा वर्षांपासून आणि राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून महायुती सरकार आहे, असे असताना इथल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं? असा सवाल करत सत्ताधारी काहीही करत नाहीत, निवडणूक आली की जातीधर्मामध्ये फूट पाडतात आणि मत घेतात, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या.
तुम्ही महाराष्ट्रातील सरकार पैशांच्या जोरावर चोरले; प्रियांका गांधींचा कोल्हापुरातून थेट PM मोदींवर हल्ला
अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या आज विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आज महाराष्ट्र दौऱ्यावर होत्या. दरम्यान दुपारी कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ गांधी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेसाठी त्या उपस्थित राहिल्या. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही याच मैदानावर सभा घेतली होती. यानंतर आज पहिल्यांदाच प्रियंका गांधी कोल्हापुरात आल्या आणि याच मैदानावर सभा घेत असल्याने या सभेला कोल्हापूरकरांनी तुडुंब गर्दी केली होती. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या या सभेला राज्याचे माजी मंत्री विश्वजीत कदम, कुस्तीपटू बजरंग पुनिया, खासदार शाहू छत्रपती यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे विधानसभा उमेदवार उपस्थित होते.
सभेदरम्यान प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे. ‘दहा वर्षे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता आहे. सत्ता काळात देशातील बड्या उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ करण्यात आले. मात्र मायबाप शेतकऱ्याला कर्जमाफी देताना सरकार पैसे नाहीत म्हणून सांगतं. केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्राला संधी मिळेल, तिथे कमजोर करत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात, मात्र त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसतात,’ अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षात मोदी सरकारने एक नवा ट्रेंड सुरू केला आहे. देशात आणि राज्यात निवडणूक आली की जातीधर्मामध्ये भांडण लावायची आणि मतं मिळवायची. राहुल गांधी यांच्यावर आरक्षणाला विरोध असल्याची टीका भाजप करतं मात्र आरक्षण मिळावं यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो आणि भारत जोडून न्याय यात्रा काढली. जातीय जनगणना झाली पाहिजे, असं स्पष्ट मत राहुल गांधी यांचं आहे. असे असताना तुम्ही केवळ टीका करता. खरंतर भ्रष्टाचारावर बोलण्याचं तुमचं धाडस कसं होत? महाराष्ट्राचं सरकार तुम्ही खरेदी केलं, तोडलं आणि मोदी तुम्ही संविधानाची गोष्ट बोलता? अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.