
Tej Police Times
मुंबई, दि. १३ : ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक महान तपस्वी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पंडित प्रभाकर कारेकर यांनी आपल्या अनोख्या गायनशैलीने आणि संगीत क्षेत्रातील सखोल ज्ञानाने श्रोत्यांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले. शास्त्रीय, नाट्यसंगीत आणि अभंग या तिन्ही प्रकारांवर त्यांची विलक्षण हुकमत होती. त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या स्वरातील ‘मर्मबंधातील ठेव…’, ‘तेरो सुख दु:ख मे आयो काम…’, ‘तजरे अभिमान…जान गुणीजन’ ‘करिता विचार सापडले वर्म…’, ‘वक्रतुंड महाकाय…’ यांसारखी गाणी संगीतप्रेमींच्या हृदयात कायमस्वरूपी रुंजी घालत राहतील. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
पंडित प्रभाकर कारेकर यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, शिष्यवर्गाला तसेच चाहत्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
००००
Recover your password.
A password will be e-mailed to you.