तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

वीज बिल वसुलीसाठी डीपी बंद, डोळ्यासमोर पिके जळताना पाहून शेतकऱ्याने जीवन संपवलं

0 46

अहमदनगर : शेतकऱ्यांकडील वीज बिल वसुलीसाठी राजकीय नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात असले तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. वीज कंपनीने थकबाकी वसुलीसाठी डीपी बंद केल्याने डोळ्यासमोर पिकांचे नुकसान होत आहे. यामुळे अवस्थ झालेल्या नगर जिल्ह्यातील शेतकऱ्याने गळपास लावून घेत आत्महत्या केली. पोपट आबाजी जाधव (वय ५५, रा. अकोळनेर, ता. नगर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे जाधव एम. ए. बीएड आहेत. नोकरी नसल्याने ते शेती करतात.या घटनेमुळे तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. या घटनेला जबाबदार असलेले अधिकारी आणि खोटी आश्वासने देणारे ऊर्जामंत्री यांच्यावर पोलिसांनी स्वत: होऊन गुन्हे दाखल करावेत, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे.

आज सकाळी जाधव यांनी त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या शेतात वीज पुरवठा करणारी डीपी वीज वितरण कंपनीने बंद केली आहे. जाधव यांची अडीच एक शेती आहे. सामुदायिक विहिरीवरून ते पाणी घेतात. शेतात कांदा आणि अन्य पिके केली आहेत. त्यांच्या वाट्याला विहिरीचे पाणी ठराविक दिवसच येते. त्यामुळे त्या काळात रात्री अपरात्री जागून शेतीला पाणी दिल्याशिवाय पर्याय नसतो. वेळापत्रकानुसार सध्या या भागात कृषी पंपांना रात्री वीज पुरवठा होता. त्यामुळे जाधव दररोज रात्री वीज येण्याच्यावेळी शेतात जाऊन पुरवठा सुरळीत झाला का, याची पाहणी करीत होते. मात्र, त्यांच्या वाट्याला निराशाच येत होती. थकबाकीसाठी डीपी बंद केले जाणार नाहीत, अशी सरकारकडून घोषणा झाल्यापासून त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. रात्रीही ते नेहमीप्रमाणे वीज आली का, ते पाहण्यासाठी गेले. मात्र, निराश होऊन परतण्याची वेळ त्यांच्यावर आली.

पाणी नसल्याने हातातोंडाशी आलेली पिके जळून जात होती. त्यामुळे ते तणावाखाली होते. याच नैराश्यातून त्यांनी पहाटे गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. याची माहिती मिळाल्यानंतर गावकरी संतप्त झाले. पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जोपर्यंत वीज वितरण कंपनीचे अधिकारी, संबंधित यंत्रणा ते थेट ऊर्जा मंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतल्याचे संदेश कार्ले आणि रामदास भोर यांनी सांगितले.

मृत जाधव उच्चशिक्षित होते. नोकरी न करता त्यांनी शेतीचा पर्याय निवडला. त्यांची दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत आहेत. जाधव मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांचे एकच शेवटचे वीज बिल थकीत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे त्यांच्यावर हा मोठा आन्याय झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी मात्र, अद्याप तिकडे फिरकले नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.