Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिंदेंच्या खासदारांच्या मतदारसंघांवर भाजपचा डोळा? लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती ठरली

5

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघांतील संघटना बांधणीसाठी भाजपची लोकसभा प्रवास योजना आज, शुक्रवारपासून सुरू होत असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली. केंद्रीय मंत्री महिन्यातून एकदा संबंधित लोकसभा मतदारसंघात एक दिवसाचा प्रवास करतील व त्यामध्ये संघटनात्मक आणि सार्वजनिक स्वरूपाचे कार्यक्रम असतील, असे त्यांनी सांगितले.

‘भाजपच्या केंद्रीय कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा प्रवास योजना राज्यात सुरू आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री प्रवास करत आहेत. त्याच पद्धतीने राज्यातील अन्य १७ लोकसभा मतदारसंघांत राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक बळकट करण्याचे काम होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी असतील. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघांची जबाबदारी असेल. नारायण राणे (सांगली), रावसाहेब दानवे (लातूर व मावळ), डॉ. भागवत कराड (परभणी व धुळे), डॉ. भारती पवार (नाशिक) आणि कपिल पाटील (रावेर व सोलापूर) या केंद्रीय मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक बळकटीचे काम होईल’, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.

राज्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटनात्मक बळकटीसाठी एक स्वतंत्र योजना लवकरच सुरू होणार आहे. त्याची जबाबदारी आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावर देण्यात आली असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्र कोणत्या कोणत्या विभागांत मागे पडला यावर श्वेतपत्रिका काढावी, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडे माझी मागणी आहे. प्रत्येक विभागाचा अहवाल मांडला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पळता भुई थोडी होईल’, असेही ते म्हणाले.

रामटेक, यवतमाळसह शिंदेंच्या खासदारांच्या मतदारसंघांवर डोळा?

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा निर्धार करीत भाजपने लोकसभा प्रवास योजनेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पाच खासदारांच्या मतदारसंघांवर डोळा ठेवून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसत आहे. भाजपने लक्ष्य केंद्रीत केलेल्या लोकसभा मतदारसंघात उत्तर पश्चिम मुंबई, नाशिक, मावळ, यवतमाळ आणि रामटेक या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या या निवडणूक रणनीतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणि भाजप यांच्यात जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.