
Tej Police Times
शरद पवार यांनी अजितदादांना फोन का केला होता?
जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या नेते पदाधिकाऱ्यांनीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर दबावातून कारवाई केल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीच्या गोटातून जयंत पाटील यांच्या निलंबनानंतर संतापाचा सूर उमटला. सारा प्रकार लक्षात घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांना दूरध्वनीवरुन संपर्क केला. सभागृहात नेमकं काय घडलं, याची माहिती घेतली. जयंत पाटील यांना नेमकं काय म्हणायचं होतं? कोणत्या कारणावरुन त्यांचं निलंबन केलं गेलं? याची माहिती पवार यांनी अजितदादांकडून घेतली.
जयंत पाटील यांचं निलंबन
विधानसभेत दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून जोरदार गदारोळ सुरू होता. या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाचेच आमदार आक्रमक झाले होते. तालिकाध्यक्ष संजय शिरसाट यांनी या दरम्यान विरोधी बाकांवरील सदस्यांना बोलण्याची संधी दिली नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील हे बोलण्यासाठी परवानगी मागत होते. मात्र, त्यांना संधी दिली नाही. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी घोषित केल्यानंतर अजित पवार यांनी ही बाब राहुल नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. ‘सत्ताधारी पक्षाच्या १४ सदस्यांना बोलण्याची संधी दिली जाते. आमच्याकडून भास्कर जाधव यांना या प्रकरणी बोलण्याची संधी द्या,’ अशी मागणी पवार यांनी केली. तेव्हा नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याला बोलण्याची संधी दिली आहे. आता पुरवणी मागण्यांवर बोला, असा सल्ला देत नार्वेकर यांनी पुढील कामकाज पुकारले. दरम्यानच्या काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार आपापल्या जागा सोडून पुढे आले होते. सभागृहात गोंधळाची स्थिती होती; तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून एक असंसदीय शब्द वापरला. याच मुद्द्यावरुन जयंत पाटील यांचं निलंबन केलं गेलं.
Recover your password.
A password will be e-mailed to you.